सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मागील वर्षीचा शेतकऱ्यांचा पीकविमा खरीप व रब्बी हंगामातील अद्याप प्रयत्न मिळाला नसल्याने जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा यांना तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सामाजिक कार्यकर्ते कैलास मेहेत्रे यांनी निवेदन देऊन, 15 दिवसात पीकविमा द्या, अन्यथा तीव्र दोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील सौभाग्याच लेण मोडून पिक कर्ज काढून, उसणवारी, व्याज-व्यवहारी करून, मुला-बाळांचे लग्न सामाजीक संस्कृतीक कार्यक्रम बाजूला सारून पुढील हंगामात आपले पिक चांगले येईल व आमची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, आमच्याही जीवनात सुख, समृध्दी येईल या अपेक्षेने आम्ही शेतकरी जिवाची बाजी लावून मागील खरीप हंगामात शेतात पिकांची पेरणी केली. वाढती मजुरी, कृषी निविष्टांचे वाढलेले भाव, नैसर्गीक आपत्ती व हंगामात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करून या वर्षी पिकले नाही पुढच्या वर्षी भरपुर पिकेल, या आशेवर आम्ही शेतकरी शेतात पिकांची पेरणी करीत असतो व भविष्याची वाट काढत असतो. मागील हंगामात खरीप व रब्बी ला तालुक्यातील शेतकन्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. संपूर्ण खरीप हंगाम कोरडा जाऊन महीनो महीने पावसाचा खंड पडला होता. त्यातच वन्य प्राणी नुकसान, गोगल गाय (हुमणी अळी), कधी वादळी वारा तर कधी अवकाळी पाऊस यामुळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी हंगामात पिंकांचे अतोनात नुकसान झाले व त्या-त्या नैसर्गीक आपत्तीत पिक विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत पिकविमा कंपनीकडे तक्रार नोंदविल्या होत्या. मागील खरीप व रब्बी हंगाम होऊन पुढील खरीप हंगामात पेरणी सुरू झाली आहे. तरीही अजून या तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यासाठी आम्ही शासनाकडे विविध मोर्चे, निवेदने, आंदोलने केली परंतु अजूनही पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. तरी, येत्या 15 दिवसाच्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिक विम्याचा लाभ मिळाला नाही तर आम्हाला तिव्र आंदोलन व उपोषणासारखे मार्ग अवलंबवावे लागेल व होणाऱ्या परिणामास तालुका कृषि अधिकारीन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही कैलास मेहेत्रे यांनी दिलेला आहे.