चिखली (विशेष प्रतिनिधी) – स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने ‘दारिद्र्य निर्मूलन’ या विषयावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मधुकर ताकतोडे यांचे अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. सरकारच्या दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना गेल्या गेल्या पन्नास वर्षापासून सातत्याने सुरू असून, त्याद्वारे भारताचा विकास होत आहे. परंतु बचत गटाच्या उपाययोजनामुळे स्वयंरोजगाराची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणात दारिद्र्य निर्मूलनात घट होत असल्याचे आपणास दिसून येते, असे डॉ. ताकतोडे यांनी सांगितले.
प्रा. डॉ. मधुकर ताकतोडे म्हणाले, की सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी तीन प्रकारे कार्य केले आहे. यामध्ये स्वयंरोजगाराचे कार्यक्रम, मजुरी रोजगार कार्यक्रम, स्वयंरोजगार व मजुरी रोजगारांचे एकत्रिकरण असलेल्या योजना, राबविण्यात आल्या आहेत. दारिद्र्य निर्मूलनाचा भागच म्हणून गरीबांच्या अन्न व पोषणांचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील तीन कार्यक्रम राबविले जातात. सार्वजनिक वितरण व्यवस्था, एकात्मिक बाल विकास योजना, राष्ट्रीय माध्यान्ह भोजन योजना, अशा योजनाद्वारे सरकारचे सार्वत्रिक प्रयत्न सुरू आहेत असे मत प्रतिपादित केले.
प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये एसपीएम महाविद्यालयाचे अर्थशास्त्र प्रमुख प्रा, डॉ. दिलीप महाजन, प्रा. डॉ. वनिता पोच्छी उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थित अतिथी प्राध्यापकांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध गुणवत्ता वाढीच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन, महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्यात व प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिता कलाखे यांनी केले. तर आभार प्रा. शशिकांत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र या विषयाचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.