लातूर (गणेश मुंडे) – लहान मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात तसेच गावोगावी फिरत असल्याची अफवा पसरवली जात आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण तसा कोणताही प्रकार जिल्ह्यात घडला नसून, लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. तसेच, या संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरवणे गुन्हा आहे, अशी माहिती लातूर जिल्हा पोलिसांच्यावतीने देण्यात आली असून, जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी वैगरे सक्रीय नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांनी नमूद केले, की मुलांना चोरणार्या महिला किंवा दहा-बारा व्यक्ती असून, त्यांच्यापासून सावध राहा, असे मेसेजेस व कुठल्यातरी जुन्या व्यक्तींचे फोटो, स्क्रीन शॉट काढून व्हाट्सअप वर फेसबुक वर वायरल केले जात आहेत. परंतु सध्या जिल्ह्यात कुठेही बाहेरून तशी टोळी आल्याचे रेकॉर्ड नाही. तरीदेखील कोणालाही एखाद्या व्यक्तीबद्दल संशय असल्यास जवळील पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, किंवा ११२ या टोल प्रâी क्रमांक हेल्पलाइनवर फोन करून माहिती द्यावी. यापूर्वी गैरसमजुतीमधून अनेक अनुचित प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना कळवावे व पोलिसांची मदत घ्यावी. सोशल मीडियावरील अफवावर विश्वास ठेवू नये. संपूर्ण खात्री केल्याशिवाय कोणतेही टेक्स्ट मेसेज, बातमी, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करण्याचे टाळावे. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवण्यात सहभागी होऊ नये. व कोणी असे करत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. अफवा पसरविणे हा गुन्हा असून अशा व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लहान मुलांची सुरक्षा हा लातूर पोलिसांचा नेहमीच प्रथम प्राधान्याचा विषय असून, याबाबत कोणतीही माहिती असल्यास ११२ या हेल्पलाइनवर किंवा जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आपल्या परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती संशयस्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला त्वरित कळवावे, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.