Chikhali

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, तरुणांनी काय दहीहंड्याच फोडत बसायचे का?

चिखली (तालुका प्रतिनिधी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या गौडबंगालामुळे तब्बल एक लाख रोजगार देणारा फॉक्सकॉन – वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार गेला असल्याने तरुणांनी काय दहीहंड्याच फोडत बसायचे का, असा सवाल करत, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प परत आणावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने चिखली तहसीलदारांमार्फत निवेदनाद्वारे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला देण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेड चिखली पदाधिकार्‍यांच्यावतीने चिखली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. फॉक्सकॉन – वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता, प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? बेरोजगारी वाढत असताना असे महत्वाचे प्रकल्प गुजरात राज्यात जाताहेत हे जाणीवपूर्वक होतंय याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आला पाहिजे. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय? असा प्रश्न राज्य सरकारला संभाजी ब्रिगेडचा आहे.

महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. परंतु आधीचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले? मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष व केंद्रातील भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत याचे गांभीर्य या सरकारला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे करण्यात व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यातून त्यांना राज्य कारभार करण्यास वेळ मिळत नसावा, पण थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले याचा खुलासा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आलाच पाहिजे. अन्यथा राज्य सरकारला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. या निवेदनाची प्रत उद्योग मंत्री भारत सरकार पियुष गोयल तसेच उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत यांना देखील पाठवण्यात आली आहे. चिखली तहसीलदार अजितकुमार येले यांना निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष विकास खंडागळे , बुलढाणा जिल्हा सचिव मदन दहातोंडे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्रावण भुसारी, संभाजी ब्रिगेड चिखली तालुकाध्यक्ष योगेश खेडेकर, चिखली विधानसभा अध्यक्ष आकाश लंबे, चिखली तालुका कार्याध्यक्ष संजय काकडे, चिखली शहराध्यक्ष गणेश देशमुख, चिखली शहर कार्याध्यक्ष गोपाल सुपेकर, चिखली शहर संघटक मंगेश भोलवनकर तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!