सोयाबीन गेले, ‘लंपी’ने जनावरे दगावली, अस्मानीच्या संकटातील शेतकर्यांना त्वरित आर्थिक मदत द्या!
– आर्थिक मदत न मिळाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा
चिखली (तालुका प्रतिनिधी) – यावर्षी चिखली तालुक्यात अतिवृष्टी आणि रायझोक्टोनीया एरियल ब्लाईट रोगामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच लंपी रोगाने शेतकर्यांची जनावरे दगावली आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकर्यांना अस्मानी आपत्तीचा सामना करण्यासाठी व त्यांच्या सबलीकरणासाठी सरकारने त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी चिखली तालुका शेतकरी संघटना युवा आघाडीने निवेदनाद्वारे तहसीलदार चिखली यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हे निवेदन शेतकरी संघटना युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद आहे, की यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि रायझोक्टोनीया एरियल ब्लाईट रोगामुळे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता, शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पीकविमा भरतो परंतु पिकाचे प्रत्यक्ष नुकसान होऊनसुद्धा विमा कंपन्या अनेक निकषांचे तकलादू निष्कर्ष लावून पिक विमा देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतो. त्यामुळे पिक विमा पद्धती ही शेतकर्यांसाठी आंधळा जुगारच ठरत असल्याचा अनुभव आहे. ऑगस्ट २०२२ पासून आजपर्यंत शेतकरी अतिवृष्टीचा मारा सहन करीत आहे, त्यामुळे सोयाबीन, उडीद, मुंग, तूर, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच ज्या शेतकर्यांची जनावरे लंपी आजाराने दगावली आहे त्या शेतकर्यांना १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी. त्वरित पंचनामे करावे व शेतकर्यांना आर्थिक मदत करावी. सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, एकनाथ पाटील, समाधान कणखर, भागवत घुबे, संदीप थुट्टे, गजानन घुबे, दीपक बाहेकर, ज्ञानेश्वर घुबे, सचिन गव्हते, मनोज थुट्टे, राजू शेटे, विठ्ठल थुट्टे, समाधान घुबे, भानुदास घुबे, ऋषी भोपळे, शशिकांत मिसाळ, प्रकाश घुबे, योगेश वाघमारे, समाधान पैठणे, अमनुल्ला खाँसाहाब, लिबांजी घुबे, शेषराव शेळके, धोंडू पाटील, अक्षय सुरुशे, अमोल घुबे, पांडुरंग घुबे, आकाश जाधव, सुभाष बांडे, लिंबाजी सुरुशे, भिका सोळंकी, विठ्ठल सोळंकी, नितेश घुबे, तुळशीदास बळप, देविदास भगत, दत्तात्रय कणखर, पुंजाजी घुबे, कृष्णा शेटे, समाधान गाडेकर, उध्दव पाटील, ज्ञानेश्वर सोळंकी, ज्ञानेश्वर वरपे, संतोष भुतेकर, तानाजी चिकने इत्यादी उपस्थित होते.