Breaking newsBULDHANAChikhali

साखरखेर्डात दहावीच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न? पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, तसे काही आढळलेच नाही!

चिखली (एकनाथ माळेकर) – साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती या मुलानेच दिल्याने साखरखेर्डासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. याबाबत मुलगा रस्त्याच्या बाजूला उभा असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची तातडीने दखल घेत, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व साखरखेर्डा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासून पाहिले. मेहकरच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते तपासले. पण, त्यांना हा मुलगा पळवून नेला जात असल्याचे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत. दरम्यान, पोलिस या प्रकाराची कसून चौकशी करत आहेत.

साखरखेर्डातील शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत असलेला इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रतिक उद्धव देशमुख हा दुपारच्या सुट्टीत साखरखेर्डा बसस्टॉपवरून पेन घेऊन जात असताना, त्याला अज्ञात दोघांनी बळजबरीने उचलून मोटारसायकलवर टाकले व मेहकरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती या मुलाने दिली आहे. परंतु, आपण त्या दोघांच्या हाताला चावा घेतल्याने, त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊ लागल्याने त्यांनी एक किलोमीटर अंतरावर सोडून पळून गेले, असेही हा मुलगा सांगत होता. याबाबतचा व्हिडिओ काही जणांनी काढला व सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे साखरखेर्डासह तालुक्यातदेखील एकच खळबळ उडाली. मुलगा ज्या रस्त्याच्या कडेला उभा होता, तिथे त्याच्या शाळेतील शिक्षक तातडीने पोहोचले व त्याला ताब्यात घेतले. तसेच, त्याचे आई-वडिलही बोलावून घेतले व त्यांच्या ताब्यात मुलाला देण्यात आले. हा व्हिडिओ व्हायरल होताच, अनेक विद्यार्थ्यांचे पालक तातडीने शिवाजी हायस्कूलकडे आले. तसेच, पालकांमध्ये एकच घबराट पसरली. या व्हिडिओची तातडीने दखल एलसीबीच्या पोलिसांनी घेतली. बसस्टॉपपासून ते मेहकरच्या दिशेने जाणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी लगेचच तपासले. तसेच, रस्तेही तपासले. परंतु, या मुलाला दुचाकीवर बळजबरीने कुणी पळवून घेऊन जात असतानाचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला नाही. उलट मुलगा रस्त्याने जात असताना काही ठिकाणी दिसून येते. या मुलाचीही अधिक चौकशी केली जात होती.  घटना खरी की खोटी?, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरीही, पोलिस कसून तपास करत असून, मुलाकडून अधिक माहिती घेतली जात होती.

मागील आठवड्यापासून मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याचे मेसेज सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मागील आठवड्यात तर अशी टोळी समजून एका तृतीयपंथीयाला जमावाने बेदम मारहाण करण्याची घटना जळगाव जामोद येथे घडली होती. वास्तविक पाहाता, अशा प्रकारची घटना कुठेही घडलेली नाही. सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ टाकून काहीजण समाजात घबराट निर्माण करत असल्याचेही पोलिसांना दिसून आले आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!