Breaking newsHead linesMarathwada

आयशर ट्रक-बसची समोरासमोर भीषण धडक; ५ प्रवासी ठार, १४ गंभीर

- जालना-वडीगोद्री रोडवरील मठ तांडा गावाजवळील दुर्देवी घटना

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अंबडपासून दहा किलोमीटर अंतरावरील जालना – वडीगोद्री रोडवर मठ तांडा गावाजवळ मोसंबी वाहून नेणार्‍या आयशर ट्रकचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला असून, त्यात बसमधील पाच प्रवासी ठार झाले आहेत, तर १४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (दि.२०) भल्या पहाटे हा दुर्देवी अपघात झाला. गेवराईहून अंबडकडे जाणार्‍या बसने आयशर ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, ही धडक इतकी भीषण होती होती, की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकून मठ तांडा येथील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावून आल्याने बचाव व मदतकार्याला लवकर सुरूवात झाली. गंभीर जखमींना अंबड येथे रूग्णालयात हलविण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

जालना-वडीगोद्री रोडवर गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरून येणार्‍या आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसमध्ये एकूण २० ते ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहे. जखमींना अंबड शहरातील प्राथमिक आरोग्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणारा आयशर ट्रक दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले होते. अधिक तपास पोलिस करत आहेत. अपघातानंतर मोसंबी घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी होऊन त्याचा चक्काचूर झाला आहे. तर बसदेखील पूर्णपणे फुटली आहे. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलीसांनाही पाचारण करण्यात आले. सकाळी सकाळी हा अपघात झाल्याने मठ तांडा गाव हादरून गेले होते. त्यांनी तातडीची मदत केल्यामुळे अनेकांचा जीव वाचू शकला.अपघाताची भीषणता दर्शविणारी दृश्ये.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!