Khandesh

स्व. बाळासाहेबांनी आम्हाला गद्दारी शिकवली नाही, आम्ही शिवसेनेसाेबत!

शहादा, जि. नंदुरबार (प्रतिनिधी) –  आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेने सोबतच राहू,  आम्हाला पदाची लालसा नाही. शिवसेना आमचा प्राण आहे पक्ष संकटात असताना सोडून जाणे ही पक्षासोबत गद्दारी असून, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गद्दारी करणे शिकवले नसून, स्वाभिमानाने ताठ मनाने जगणे शिकविले आहे, असे आश्वासन आमदार आमश्या पाडवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी आमदार पाडवी व जिल्हा सह संपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आम्ही पक्षाशी गद्दारी करणार नाही. अखेरच्या श्वासा पर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्यावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेशी  एकनिष्ठ राहू, अशा आशयाचे अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील 5 हजार तर शहादा विधानसभा क्षेत्रातील अडीच हजार असे सुमारे साडेसात हजार शपथपत्र शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भेट स्वरूपात दिले .  यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांची संवाद साधताना श्री ठाकरे म्हणाले, माझे नंदुरबार जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले होते हे मला मान्य आहे. आदिवासी भागात सातपुडा पर्वतरांगेत शिवसेनेचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक प्रामाणिकपणे करत आहे. त्यांना ताकद देण्यासाठी विधान परिषद निवडणुकीत जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली. आमश्या पाडवी यांच्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेला भक्कम बळ देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने याच दरम्यान काहींनी विश्वासघात केल्यामुळे अभूतपूर्व  परिस्थिती उद्भवली आहे. या संकट समयी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिक माझ्यावर विश्वास व्यक्त करून पक्षाशी एकनिष्ठ आहेत ही गौरवस्पद बाब आहे. येत्या काळात मी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करणार असून प्रत्यक्ष नागरिक व शिवसैनिकांशी भेटी घेऊन संवाद साधणार आहे. शपथपत्र दिली म्हणजे आपले कार्य संपले असे समजू नका, कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नका, भविष्यात आपल्याला फार मोठी लढाई लढायची आहे यासाठी सर्वांनी सदैव तत्पर राहून सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कार्य करावे पक्ष सदैव एकनिष्ठ शिवसैनिकांशी पाठीशी राहील अशी ग्वाही मी यावेळी देतो., असेही ठाकरे यांनी सांगितले.

या संवादा दरम्यान श्री ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, विधान परिषद सदस्य सचिन अहिर, धुळे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, यांनीही नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांची चर्चा करून त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके, माजी जिल्हा उपप्रमुख सुनील सोनार, माजी नगरसेवक विनोद चौधरी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, जगदीश चित्रकथी,  अक्कलकुवा तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, कुलदीप टाक, नरेंद्र जोशी , शाकीब पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

रघुवंशी हे आमदारकीसाठी शिवसेनेत आले हाेते..

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी माझी भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीबहुल भागात शिवसैनिकांना बळ मिळेल, यासाठी  मी त्यांना सत्ता आली तर तुम्हाला विधान परिषदेत पुन्हा आमदारकी देईल ,असा शब्द दिला होता . मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत श्री रघुवंशी यांचे नाव पाठवून माझा शब्द पाळला होता. मात्र दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नाही. परिणामी ते आमदार झाले नाहीत . अशा परिस्थितीत त्यांनी शिवसेना सोडली. श्री रघुवंशी हे आमदारकीच्या लालसेने शिवसेनेत आले होते आमदारकी मिळाली नाही तर ते पुन्हा शिवसेनेला सोडून गेले, असे उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेस  तर जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये आले होते हे दोघेही त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना सोडून गेले आहेत . यामुळे जिल्ह्यातील खरे शिवसैनिक आजही पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेची एकनिष्ठ आहेत. भविष्यातही एकनिष्ठ राहणार आहे. आज पक्षप्रमुखांशी झालेल्या संवादा दरम्यान जिल्ह्यातील शिवसैनिकांना नवी ऊर्जा मिळाली आहे. भविष्यात निश्चितच नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची भरीव कामगिरी होईल.

– अरुण चौधरी, नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!