ऐन सणासुदीत लालपरीची चाके थांबली; एसटी कर्मचारी संपावर!
एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने एसटी कर्मचार्यांचा संप आज, दि. ३ सप्टेबरपासून सुरू झाला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, ऐन पावसात प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत. तर सकाळच्या बसेस न आल्याने अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. ऐन सणासुदीत संप पुकारला गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होणार असून, राज्य सरकारप्रती संतापात आणखीच भर पडणार आहे.
सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतन द्यावे, या व इतर मागण्यांचे आश्वासन देऊनही ते शासनाने पाळले नाही, असा आरोप करत महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आज, दि. ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा जिल्ह्यात चांगलाच परिणाम दिसून आला .खामगावस शेगाव, मलकापूर, बुलढाणा, जळगाव जामोद आदी आगारातील बहुतांश बसेस आगाराच्या बाहेर फिरकल्यादेखील नसल्याची माहिती आहे.
राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने ३ सप्टेंबररोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद आहेत. इतर आगारांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः काम सुरू आहे. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही. परंतु, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही. परंतु, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.
मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली तातडीची बैठक
दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत बंद पुकारल्यानंतर राज्य सरकार हादरले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या, दि.4 सप्टेंबररोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे संघटनांच्या प्रतिनिधीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीस परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्य सरकार काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
—-
मेहकर, चिखली आगारातील काही बसेस वृत्त लिहिपर्यंत सुरळीत सुरू होत्या, अशी माहिती संबंधितांकडून मिळाली आहे. विविध मागण्यासाठी खामगावसह इतर काही आगाराबाहेर कर्मचार्यांचे धरणे आंदोलनदेखील सुरू असल्याची माहिती आहे. एसटी कर्मचार्यांना सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतन देण्याबाबतची मागणी पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेला दिले होते, परंतु सदर मागणी पूर्ण न केल्याने हा संप पुकारला असून, यात जवळजवळ 11 संघटना सहभागी असल्याचे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार कृती समितीचे सदस्य गजानन सोनोने यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे.
एसटी कामगारांच्या मागण्या काय?
एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.
गणेशोत्सव काळात काय होणार?
गणेशोत्सवानिमित्ताने एसटीला प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दर्शवला असून ४,९५३ जादा बस आतापर्यंत पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे हे धरणे आंदोलन संपले नाही तर ऐन गणेशोत्सवात गावी निघणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो.