बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – येथील आंबेडकरी विचारवंत तथा लेखक रवींद्र साळवे यांनी दिलेल्या ‘आंबेडकरी चळवळ आणि आर्थिक प्रश्न’ या पुस्तकाच्या सुधारित द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथे संपन्न झाले.
दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी बौद्ध प्रगती मंडळ ठाणे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वसंतविहार सोसायटी व म्हाडा कॉलनी ठाणे द्वारा आयोजित केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले आणि नंतर कार्यक्रम संपन्न झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी रवींद्र साळवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरद कलावंत यांनी निवेदन करून या पुस्तकाची माहिती दिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात सामाजिक, धार्मिक, साहित्यिक आणि राजकीय चळवळी उदंड झाल्या. मात्र आर्थिक चळवळी फारशा झाल्या नाहीत, असे सांगून त्यांनी या पुस्तकावर प्रकाश टाकला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वीरेंद्र जाधव, विलास अडसूळे, शरद कलावंत आणि विजय नांदगावकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन शरद कलावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव मनीष गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी मंत्रालयालयातील निवृत्त सहसचिव एच. बी. तायडे, सुमित खोब्रागडे, मधुकर लांडगे, सुधाकर कदम, संभाजी गायकवाड यांच्यासह मंडळाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.