संविधान वाचविण्यासाठी शेवटची संधी; वंचित आघाडीला मतदान करू नका – तुषार गांधी
– ‘वंचित’ ही तर भाजपची ‘बी’ टीम, ‘वंचित’ला मतदान करू नका – तुषार गांधी
मुंबई (प्रतिनिधी) – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, सत्ताधारी भाजपची युती गद्दारांची आहे. या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणे महत्त्वाचे आहे. यासाठी कुणीही एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेत ,त्यांची टीका फेटाळून लावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः तुषार गांधी यांना रोखठोक शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशात पुन्हा एकदा गांधी-आंबेडकर आमने-सामने आल्याचे दिसून आले.
तुषार गांधी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपची युती ही गद्दारांची युती आहे. तिचा पराभव झाला पाहिजे. यासाठी मतदारांनी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये. महाविकास आघाडीला मतदान करावे, असे ते म्हणाले. यापूर्वी जी चूक झाली तीच पुन्हा होण्याची भीती आहे. त्यामुळे आमची कितीही चांगली मैत्री असली तरी चुकीला चूक म्हणण्याची वेळ आला आली आहे. कारण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असे तुषार गांधी म्हणाले.
दुसरीकडे, तुषार गांधी यांच्या या टीकेला वंचित बहुजन आघाडीने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, प्रस्थापित पक्ष व त्या पक्षांच्या राजकारणाला मदत करणाऱ्या सहयोगी घटकांची शोषित व वंचितांचे राजकारण उभे राहू नये अशी इच्छा आहे. त्यामुळे ते सातत्याने असे प्रयत्न करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही असाच विरोध झाला. त्यांच्यावरही इंग्रजांचे हस्तक असल्याचे आरोप झाले. तेच नरेटिव्ह आता प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी वापरले जात आहे. प्रकाश आंबेडकर लोकशाहीचा वास न पोहोचलेल्या पालापर्यंत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते येथील प्रस्थापितांना सहन होत नाही, असे ते म्हणाले. स्वतः आंबेडकर यांनीही ट्वीटरद्वारे गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्ही केलेले विधान अत्यंत चुकीचं, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहे. लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात- धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे, असं प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे.
काय म्हणाले तुषार गांधी?
‘साम’ या वृत्तवाहिनीशी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, भाजपाच्या युतीला गद्दारांची युती म्हटले पाहिजे. या गद्दाराच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे. यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन तुषार गांधी यांनी केले. याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, “आमची कितीही चांगली मैत्री असली तरी जे चूक आहे, त्याला चूकच म्हणायची आता स्पष्ट वेळ आली आहे. यापूर्वी जी चूक झाली, तीच पुन्हा होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जपायचे असेल तर ही शेवटची संधी आहे.”
—-