– साकेगाव येथील कधी बंद न होणारी दारूविक्री बंद
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांमध्ये काही मोठे गावे पडतात. त्या गावांमध्ये प्रमुख सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सैलानी गावसुद्धा रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या पोलीस स्टेशन अंतर्गत लोकांना शिस्त लावण्याची आवश्यकता होती, अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे लोक सैलानी येथे लॉज व झोपड्यांमध्ये राहतात, परंतु ठाणेदार दुर्गेश त्यांनी सर्वांना केवळ शिस्तच लावली नाही तर त्यांनी चार महिन्यांमध्ये दमदार कामगिरी करून लोकांच्या मनात एक वेगळी छाप पाडली आहे. विशेष बाब म्हणजे, साकेगावसारख्या अनेक गावांतील कधीही बंद न होणारी अवैध दारूविक्री त्यांनी बंद करून दाखवली आहे.
ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी जुलै महिन्यामध्ये रायपूर पोलीस स्टेशनचा त्यांनी पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून तर आतापर्यंत अवैध धंदे गुन्हे तसेच सामाजिक बांधिलकी या नात्याने त्यांनी स्वतः स्वच्छता करून एक वेगळा ठसा समाजासमोर उमटवला आहे. अवैध धंदेवाल्यांना त्यांनी सळो पळो करून सोडले, अवैध दारूविक्रेते तसेच अवैध धंदेवाल्यावर आतापर्यंत त्यांनी ४५ केसेस करून ४७ हजार ५१५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. अनेक हातभट्टी त्यांनी स्वतः उध्वस्त केले आहेत. पोलीस स्टेशन अंतर्गत हरवलेल्या दोन पुरुष, एका महिलेचा तात्काळ शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीनदेखील त्यांनी केले आहे. चोरीच्या दोन घटना तात्काळ उघडकीस आणून चोरांकडून ९७ हजार रुपयांचा मुद्देमालदेखील त्यांनी जप्त केला. तसेच पोलीस स्टेशनला दाखल संवेदनशील प्रकरणात इसमावर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाहनधारकांना त्यांनी चांगली शिस्त लावली. सैलानीबाबा यांच्या दर्शनाकरिता संपूर्ण देशभरातून विविध भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने वाहनांची रहदारी खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहतूक नियमन खूप महत्त्वाचे असल्याने त्यांनी अवैध वाहतूक व इतर वाहतुकीचे नियम न पाळणार्या वाहनधारकावर मोवाका अंतर्गत २२८ केसेस केल्या व चार लाख नऊ हजार शंभर रुपयाचा दंडदेखील वसूल करून कारवाई केली.
सामाजिक बांधिलकी म्हणूनसुद्धा वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यामध्ये सैलानी येथे केलेली साफसफाई असो, चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे असलेल्या सेवा संकल्प प्रतिष्ठान यांचे मुख्य असलेले डॉक्टर पालवे यांच्याशी संपर्क करून सैलानी येथे असलेले निराधार व्यक्ती, अंध व्यक्ती, अपंग, मतिमंद असलेल्या लोकांना त्यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये दाखल केले. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील साकेगाव, खोर, माळशेंबा व अंत्रीकोळी येथील महिलांनी दिलेल्या निवेदनानंतर त्या गावांमध्ये संपूर्ण दारूबंदी केली. त्यामुळे रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत लोकांमध्ये व महिलांमध्ये एक वेगळी छाप ठाणेदार राजपूत यांनी पाडून लोकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये दुर्गेश राजपूत यांच्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त होत आहे. ठाणेदार असावां तर असा, अशी भावना लोक व्यक्त करित आहे.