आळंदी (अर्जुन मेदनकर) : आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारत देशाचा आधारस्तंभ हे उद्दिष्ट नजरे समोर ठेवून आपल्या नाजूक परिस्थितीमुळे कोणताही होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शैल फाउंडेशन ही संस्था समाजातील दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षापासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत आहे. याच उद्देशाने श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील एकूण २२५ होतकरू विद्यार्थ्यांना जवळपास तीन लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य त्यामध्ये पुस्तक, वह्या, बॅग, एस.एस.सी. बोर्ड परीक्षेची फी तसेच विद्यालयातील दिव्यांग विभागातील मुलींना गणित पाटी व त्यासाठी आवश्यक साहित्य अशी मदत करून त्यांच्यातील आत्मविश्वासाचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
या प्रसंगी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित माजी शिक्षिका पार्वतीबाई चव्हाण, उद्योजक गणेश चव्हाण, शास्त्रज्ञ डिफेन्स प्रवीण नाईक, विश्वस्त, शैल फाउंडेशन दिलीप टिकले, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे आदी उपस्थित होते. दिलीप टिकले यांनी शैल फाउंडेशनच्या वतीने मिळणार्या मदतीचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सदुपयोग करून मोठे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्था हिरीरीने प्रयत्न करत आहे असे विचार व्यक्त केले. पार्वती चव्हाण व गणेश चव्हाण यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर गरीब व गरजू विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी शैल फाउंडेशन संस्थेच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक दीपक मुंगसे यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले. आभार रामदास वहिले यांनी मानले.