पालघर (जिल्हा प्रतिनिधी) – एसएफआयचे चौथे ठाणे-पालघर जिल्हा अधिवेशन साेमवारी वाडा येथे संपन्न झाले. वाडा येथील संघटनेच्या कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या अधिवेशनाची सुरुवात संघटनेचे ध्वज फडकावून आणि शहीदांना अभिवादन करून झाली.
या अधिवेशनास मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस प्राची हातीविलेकर, एसएफआयचे केंद्रीय कमिटी सदस्य व राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, केंद्रीय कमिटी सदस्य व राज्य उपाध्यक्ष डॉ.कविता वरे, किसान सभेचे नेते कॉम्रेड किरण गहला, कॉम्रेड प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.
अधिवेशनात मागील कार्याचा तसेच शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. या अधिवेशनाने २१ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटी निवडली. नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून नितीन कानल आणि जिल्हा सचिव म्हणून भास्कर म्हसे यांची एकमताने निवड करण्यात आली.