नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – गोरगरीब शेतकर्यांना मिळणारे रेशनचे धान्य राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने बंद केले आहे. त्यामुळे गोरगरीब शेतकर्यांची मोठी परवड होत आहे. हे बंद केलेले स्वस्त धान्य वाटप शेतकर्यांना पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नांदुरा तालुक्यातील शेतकर्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद आहे, की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो पिकवतो अन् सार्या जगाला पुरवतो. पण पिकाला हमीभाव न मिळाल्यामुळे व कायम निसर्गाच्या असंतुलीतपणामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात असतो व दारिद्र्याचे जीवन जगतो, याला कोणाला एकाला जबाबदार धरता येणार नाही. पण शेतकर्याची ही परिस्थिती बदलायला हवी, हे सरकार मायबाप म्हणून तुमच्याकडे आम्हा शेतकर्यांचे मागणे आहे. शिवाय, शासनाकडून जो शिधा (रेशन) वाटप करण्यात येतो, तोही आता शेतकर्यांना मिळणे बंद झाला असल्याने शेतकरी आणखी विवंचनेत पडला आहे. तरी शेतकर्याला पूर्ववत स्वस्त धान्य मिळावे, करिता निवेदनाच्या माध्यमातून नांदुरा तालुक्यातील शेतकर्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.