आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अहमदनगर वांग्मय वाङ्मयोपासक मंडळ निर्मित व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुनः प्रकाशित ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ भाग एक व दोन या सन १९३४ मध्ये प्रकाशित ग्रंथाच्या संशोधित द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन आणि लोकार्पण आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात उत्साहात झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख सत्र व पुणे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख होते.
याप्रसंगी लोकार्पण सोहळ्यास संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे, सह. धर्मदाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरीक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, आळंदी संस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.विष्णू तापकीर, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रींचे सेवक बाळासाहेब रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर शेखर यांचेसह वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होती.
यावेळी डॉ. मोरे म्हणाले, यापूर्वी ८९ वर्षां पूर्वी प्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन झाले होते. त्याची पुनः प्रकाशित संशोधित आवृत्तीचे लोकार्पण आता होत आहे. यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील अभ्यास पूर्ण लेखन आहे. साधक,अभ्यासक यांना लोकार्पण केलेला ग्रंथ अभ्यासास उपयुक्त असून हा अमूल्य ठेवा ठरेल असे त्यांनी सांगितले. प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज यांचे पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नगरीत आपला वावर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज तत्त्वज्ञ व कवी आहेत. यामुळे आळंदीला एक वेगळी ओळख मिळाली असल्याचे सांगितले. यावेळी आवृत्तीचे संपादक शिरीष लांडगे, साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड, विश्वस्त अभय टिळक आदींनी प्रकाशित ग्रंथ विषयी मार्गदर्शन व अनुभव सांगितले.