मेरा बुद्रूक, ता.चिखली (एकनाथ माळेकर) – सिंदखेडराजा तालुक्यातील बाळसमुद्र या गावात सरपंच व ग्रामसचिव यांच्या निष्क्रियतेमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून, घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तसेच पाणी पुरवठा करणार्या जलकुंभाची साफसफाईदेखील करण्यात आलेली नसून, लाखो रुपये खर्च करून बांधकाम झालेल्या नालीद्वारे कोणतेही घाणपाणी काढण्यात आलेले नाही. शौचखड्डेदेखील निकृष्टदर्जाचे करण्यात आलेले असून, ते तुंबलेले आहेत. सद्या सर्व घाणपाणी रस्त्यावर वाहत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्या साधना बोरकर व गावकर्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
बाळ समुद्र ग्रामपंचायत असलेल्या या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटारेदेखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. तर काही ग्रामस्थांनी सांडपाण्यासाठी असलेले शोषखड्डेदेखील बुजवून घेतल्याने हे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याचे दिसते. याबाबत ग्रामपंचायत सदस्या साधना बोरकर व गावकर्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे, की या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे ग्रामस्थ बेजार झाले आहेत. आधीच डेंग्यू ताप भीतीचे वातावरण झाले आहे, तर आता जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने व गावात घाणीचे साम्राज्य परसल्याने गावकर्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या तक्रारअर्जावर गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.