मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – विद्यार्थी आणि शिक्षकांचे यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणार्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो. चिखली तालुक्यातील रोहडा कार्यरत असणारे शिक्षक अण्णा माळेकर यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना गहिवरून आले. तर शिक्षक अण्णा माळेकर यांना देखील अश्रू अनावर झाले.
चिखली तालुक्यातील रोहडा येथे दिनांक १ मे २०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा रोहडा येथून सेवानिवृत्त होणारे शिक्षक अण्णा माळेकर यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी व शिक्षक वृंद यांनी १ मे रोजी शाळेच्या पटांगणामध्ये आयोजित केला होता. त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी गजानन देवकर, मुख्याध्यापक श्री.गाफने सर व सरपंच व पोलीस पाटील व शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद व गावकरी मंडळी उपस्थित होते. अण्णा शामराव माळेकर यांचा सेवा निवृत्तीचा कार्यकाल हा ३० एप्रिल २०२३ रोजी संपला होता. १ मेचे औचित्य साधून ज्या शाळेवर कार्यरत होते त्या ठिकाणी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी मंडळी व शिक्षकवृंद यांनी आयोजित केला होता. अण्णा माळेकर हे गेल्या साडेचार वर्षांपासून रोहडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्यांच्या शिक्षण शिकवण्याची पद्धतची विद्यार्थ्यांना चांगलीच भुरळ पडली होती. त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हा परिषद रोहडा येथे विद्यार्थी मूल व मुली यांनी अण्णा शामराव माळेकर यांना घोळक्यात घेऊन गुरुजी अजून एक वर्ष थांबा ना अशी भावनिक हाक दिली. ही चिमुकली हाक म्हणजे, शिक्षक कसा असावा याचे जिवंत उदाहरण ठरली. अण्णा माळेकर यांनी त्यांच्या ३५ वर्ष शिक्षण योगदानामध्ये अनेक विद्यार्थी एमबीबीएस डॉक्टर, इंजिनियर व बरेच विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावर लावण्याचे काम आपल्या शिक्षक कार्यकाळामध्ये केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागामधून गटशिक्षण विस्तार अधिकारी गजानन देवकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते, बर्याच शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शिकवण्याच्या अनुभव सांगितले. तसेच गावातील एका महिलेनेसुद्धा त्यांच्या मुलाच्या बाबतीतचा अनुभव सांगितला. त्यावेळेस उपस्थिताचे मन गहिवरूनआले होते, कारण त्या महिलेने त्यांच्या मुलाचा जो अनुभव सांगितला तो सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा होता. शिक्षक अण्णा माळेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रोहडा येथे मोठ्या सन्मानाने निरोप समारंभ साजरा करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस शिक्षकांना गराडा घातला, त्यावेळेस एक भावनिक वातावरण तयार झाले व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यावेळेस जिल्हा परिषदेचे शिक्षक अण्णा माळेकर यांनी बाळांना मी अजून चाललो नाही. एक वर्ष येणार आहे, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या समजूतीसाठी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून मी या शाळेवर येणार आहे, असे भावनिक आवाहनसुद्धा यावेळी केले होते. शिक्षकाचे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात किती असते हे खरंतर सांगायची गरज नाही, एक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितो, मुलांना सुशिक्षित करण्याबरोबर त्यांच्या चुका व अनेक गोष्टी प्रभावीपणे सांगत आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो, म्हणूनच शिक्षकांना ईश्वराच्या बरोबरीचे स्थान समाजात दिले जाते. केवळ विद्यार्थीच नाही तर समाजातही अशा शिक्षकांना मानाचे स्थान असते. जे शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी आपले जीवन घालवतात.
अण्णा माळेकर यांच्या निवृत्तीनंतर विद्यार्थी व गावकरी मंडळी यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. चिखली तालुक्यात प्रथमच शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. प्रत्येक गावकरीसुद्धा असा शिक्षक पुन्हा होणे नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत होते. या निरोप समारंभासाठी रोहडा शाळेचे मुख्याध्यापक, रोहडा गावचे सरपंच, उपसरपंच, पत्रकार मंडळी, माजी सरपंच, शाळा समिती अध्यक्ष सर्व शाळा समितीचे सदस्य, गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी तसेच अनेक मान्यवरांसह रोहडा गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळीची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती यांनी अथक परिश्रम घेतले.