– काँग्रेसच्या ‘जय भारत सत्याग्रहा’चा यशस्वी समारोप
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – देशातील भाजपाचे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या सरकारी संस्थांचा गैरवापर करून देशभरात एक चुकीचा संदेश देत आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात दाखविलेल्या तत्परतेबद्दल देशात सत्ताधारी भाजपा सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. तर हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करून देशातील जनतेची दिशाभुल करून लोकशाहीची गळचेपी करीत आहे. संविधान अडचणीत आणून लोकशाहीला मुळासगट उखडून टाकू पाहत असल्याने लोकशाही धोक्यात आली असल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. काँग्रेसच्या जय भारत सत्याग्रह समाप्तीप्रसंगी चिखलीत आयोजित भव्य मशाल रॅलीप्रसंगी ते बोलत होते. या रॅलीत महाविकास आघाडीच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता.
केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकार विरूध्द लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने देशभरात ‘जय भारत सत्याग्रह आंदोलन’ पुकारले गेले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावूुन त्यांची खासदारकी रद्द केली, मोदींनी लोकांच्या कष्टाचा पैसा आणि राष्ट्राच्या संपत्तीची सुरू केलेली उघड लूट करणार्या भाजपा मोदी सरकारच्या विरोधात १० एप्रिल २०२३ चिखली काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मशाल आंदोलन करण्यात आले. काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने जयस्तंभ चौकातील अशोक वाटिकेपासून काढण्यात आलेला हा मशाल मोर्चा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅन्ड, महाराणा प्रताप पुतळा, डि.पी. रोड, जिनींग प्रेसींग रोड, एकता नगर, पेट्रोल पंप मार्गे जयस्तंभ चौकातील अशोक वाटिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन करून या मशाल आंदोलनाचा समारोप करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मशाल आंदोलनप्रसंगी मोदी सरकारच्या निषेधार्थ प्रचंड नारेबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीतील सर्वच सेल व विभागाचे प्रमुख पदाधिकारी, महिला, तथा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.