जालना (ब्रेकिंग महाराष्ट्र) – विधवेसह तिच्या दोन मुलींना जीवंत जाळण्याचा प्रयत्न जाफ्राबाद तालुक्यातील कोनड येथे घडला आहे. रात्रीच्या सुमारास आरोपीने त्यांच्या शेतातील घर पेटवून दिले. याबाबत २२ वर्षीय मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, यासाठी तिने काकावर आरोप घेतला आहे. शेतीच्या वादातून काकानेच आम्हाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तिने पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेने जाफ्राबाद तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे.पूनम राजेश्वर परिहार या २२ वर्षीय युवतीने जाफ्राबाद पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीत नमूद आहे, की लहान बहिणीसह व विधवा आईसह आम्ही शेतात राहतो. तर वडिल हे मागील पाच महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेले आहेत. मोठ्या काकांशी आमचा शेतीचा वाद सुरु आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी पेरणीच्या कारणावरून आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिनांक ३ जुलैच्या रात्री आई, बहिण व आपण शेतातील बखारीत (घरात) झोपलो असता, रात्री ९ वाजेच्या सुमारास घराला आग लागल्याचे माझ्या लहान बहिणीच्या लक्षात आले. तिने आम्हाला उठवले असता, आम्ही घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणी तरी बाहेरून कडी लावलेली होती. आईने कसे तरी खुर्चीवर उभे राहून दरवाजाची कडी उघडली व आम्हाला कसे तरी घराबाहेर काढले. घराच्या बाहेर आम्हाला आमचे मोठे काका समाधान परिहार हे तेथे दिसले. त्यांच्या पाठीवर चार्जिंगचा पंप होता व हातात टेंभा होता. त्यांनी आमच्या अंगावर स्प्रे मारला व आग लावली. त्यामुळे माझा उजवा हात, पाठीवर व हातावर जळाल्याने जखमा झाल्यात. आई मंगलाबाई हिच्या पोटावर जळाल्याने जखमा झाल्यात, लहान बहीण पळून गेल्याने तिला जखमा झाल्या नाहीत. आम्ही आरडाओरड केल्याने गावातील लोकं धावून आले व त्यांनी आम्हा तिघींनाही चिखली येथील खासगी दवाखान्यात नेले. त्यानंतर माझे मामा गणेश इंगळे यांनी आम्हाला बुलडाणा येथील सरकारी दवाखान्यात भरती केले आहे.
काका समाधान रामसिंग परिहार यांनी आम्हाला जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
Leave a Reply