भाजपचे राहुल नार्वेकर हे विजयी व्हावे, ही ‘राष्ट्रवादी’चीच खेळी का?
राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावाई
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर हे एकदाचे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांची गैरहजेरी कशी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. बरं हे जे नवे तरुण अध्यक्ष आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय रामराजे निंबाळकर यांचे जावाई आहेत. त्यामुळे नेमके अजितदादा पवार समर्थक आमदारांची सभागृहातील गैरहजेरी यानिमित्ताने राज्यात चर्चेचा मुद्दा बनलेली आहे.
रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गेली २३ वर्षे शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. सध्या ते विधानपरिषद आमदार आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे ३९ वे वंशज आहेत. आणि, आणखी एक विशेष बाब म्हणजे, नार्वेकर हे आदित्य ठाकरे यांचे अगदी खास मित्र आहेत. त्यामुळे नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदी संधी देऊन भाजपने राष्ट्रवादीची राजकीय गोची केली? की, नार्वेकरांना निवडून येण्यास आपले आमदार गैरहजर ठेवून राष्ट्रवादीने राजकीय खेळी केली?, असे प्रश्न चर्चेत येत आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ सदस्यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अध्यक्षीय आसनावर विराजमान केले.
सूत्रांना काय घंटा कळते? चॅनलवाले पुन्हा तोंडावर पडले!
आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, बहुतांश चॅनेल, माध्यमं, त्यांची तथाकथित सूत्रे यांना घंटा काही माहिती नसते. आज सकाळी दोन तास ते टेप वाजवत होते, की विधिमंडळातील शिवसेनेचे कार्यालय सील झाले! नंतर आदित्य ठाकरे यांनी येऊन सर्वांचा पोपट केला. सील वैगेरे काही नाही; कुणी गद्दार चुकून कार्यालयात शिरू नये, म्हणून आम्हीच कुलूप लावले आणि चावी आमच्याकडेच आहे. काहीही खातरजमा नाही, काही तपासून घेणे नाही. कुणी काही सांगितले, पुडी सोडली की तेच घेऊन पळत सुटायचे! गेल्या काही दिवसात कित्येक वेळा या चॅनलवाल्यांचा पोपट झाला, कितीदा तोंडावर आपटले; पण सुधारायचे काही नाव नाही. काहीतरी ठुसकी सोडून कुणीतरी आपल्याला वापरून घेते, हेच या मंडळींच्या लक्षात येत नाही.
——————-