बुलढाणा (खास प्रतिनिधी) – सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने वाहतूक नियमन करणे व कसूरदार वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी काढला असून, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा २० मार्चपासून जिल्हाभर विशेष मोहिमे अंतर्गत अॅक्शन मोडवर येणार आहे. दरम्यान, वाहतूक नियमांचे पालन करण्यासह वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांनी केले आहे.
जिल्ह्यात व शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाहने रस्त्यावर सुसाट धावत असून, प्रवास धोक्यात सापडला आहे. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने वाहतूक शाखा आता कारवाईचा बडगा उगारणार आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहतूक करणार्या वाहनधारकांनी प्रवासी वाहतुक करते वेळी विमा, फिटनेस प्रमाणपत्र, पी.यु.सी, आर.सी, वाहन परवाना व स्वतःचे वैध लायसन्स प्रवासी वाहतुकीदरम्यान जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच प्रवासांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आपल्या वाहनांची स्थिती कशी आहे? या बाबत आरटीओ यांचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. प्रवासी वाहतुक करतेवेळी वाहतुक नियमांचे पलन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेने सांगितले. २० फेब्रुवारीपासून जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा विशेष मोहिम सुरू करणार असून, कसूरदार वाहनचालकावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.