उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – उद्योगपती अदानी यांची कंपनी वीज वितरण क्षेत्रातही येऊ घातली असून, तिने वीज नियामक आयोगाकडे तसा परवाना मागितला आहे. खासगी कंपन्या वीज वितरण क्षेत्रात आल्यातर त्याचा सर्वात मोठा फटका महावितरण कंपनीला बसेल. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी निर्णयाच्या विरोधात उमरगा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कामगार व अधिकारी यांनी द्वारसभा घेत तीव्र आंदोलन केले, तसेच सरकार व अदानी यांचा निषेध केला.
अदानी इलेक्ट्रिसिटीने महावितरणच्या मुंबई उपनगरात समांतर वितरण परवाना मिळावा, यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. वीज नियामक आयोगाने परवानगी दिली, तर त्याचा मोठा आर्थिक फटका महावितरणला बसणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. कोणत्याही खाजगी कंपन्या वीज ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकत नाहीत. कोट्यवधी रुपये बुडवून कंपन्या निघून गेल्या आहेत, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
यावेळी उमरगा येथील महावितरण कार्यालयासमोर वीज अधिकारी व कर्मचार्यांनी द्वारसभा घेतली. यावेळी या निर्णयाला आपला विरोध दर्शवत राज्य सरकार व अदानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी या आंदोलनात संघर्ष समितीचे सुनील बडे, जयंत जाधव, गोपाळ जोशी, अमोल पाटील, श्याम आबाचने, मोहन सुर्यवंशी, गगन रणखांब, राजेंद्र जामगे, अनिल कोल्हे, भीमराव चव्हाण, युवराज माने, आप्पाराव लवटे, सातय्या स्वामी, महंमद लदाफ, किरण जमादार, महादेव पाटील, विलास डोंगरे, सुधीर आचारे, यांच्यासह वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.