– शिवरायांविषयी बोलले त्याचक्षणी राज्यपाल महाराष्ट्रासाठी संपले : गणेश निकम
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध होत आहे. केळवद येथे ग्रामस्थांनी राज्यपालांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून त्यांना स्मशानात पोहोचविले. यावेळी चार खांदेकरी व तिरडीदेखील धरण्यात आली. वाजत-गाजत हे प्रेत स्मशानात नेण्यात आले. शिवाजी महाराजांविषयी बोलले त्याच दिवशी त्याक्षणी राज्यपाल महाराष्ट्रासाठी संपले.. अशी संतप्त भावना यावेळी पत्रकार गणेश निकम केळवदकर यांनी व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सतत काही ना काही वक्तव्य करुन चर्चेत राहत आहे. विशेषतः ते महाराष्ट्रातील महापुरुष आणि जनतेविषयी आकस ठेवून असल्याचे दिसते. त्यांनी ‘शिवाजी तो पुराणे जमानेके आदर्श’ असे अफलातून वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदय सिंहासनावर आरुढ असतांना महाराजांना कमीपणा आणणारे वक्तव्य राज्यपालांनी केले. यापूर्वी सुध्दा त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्याबद्दल असेच वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केळवद ग्रामस्थांनी तिरडी धरली. केळवद बसस्थानक येथे तिरडीवर प्रतिकात्मक प्रेत ठेवण्यात आले.
तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायण वाणी यांनी तिरडी धरली. तर गणेश यंगड व इतरांनी त्या प्रेतास खांदा दिला. यावेळी नंदुआप्पा बोरबळे, बाजीराव उन्हाळे, गोपाल वाघमारे, श्रीकृष्ण गवते आदी तरुणांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. सरपंचपती प्रताप पाटील, माजी सरपंच द्वारकाताई भोसले, ज्ञानदेव कालेकर, मिराताई आखाडे, अशोक मोहिते, धनराज पाटील, आदी ग्रामस्थ अंत्ययात्रेत सामील झाले. वाजत गाजत ही अंत्ययात्रा गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमीत पोहोचली. या ठिकाणी शोकसभा घेण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कर्हाडे हेसुध्दा मिरवणूकीत काही काळ सहभागी झाले. यावेळी नारायण वाणी, द्वारकाताई भोसले, नंदुआप्पा बोरबळे, बाजीराव उन्हाळे, प्रताप पाटील यांनी राज्यपालांविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. राज्यपालांना तात्काळ हटविण्यात यावे, भाजपाच्या नेत्यांनी राजकारणासाठी राजकारन न करता किमान महाराजांचा तरी आदर करावा असा सूर शोकसभेत व्यक्त कर ण्यात आला.