बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – काही दशकांपूर्वी वंजारी समाजाची ओळख दऱ्या-खोऱ्यात व कडी-कपाऱ्यात राहत असल्याने अशिक्षित व अडाणी अशी होती, परंतू कष्टाने व जिद्दीने या समाजाने एक वेगळी ओळख आता निर्माण केली असून आज स्वकतृत्वाने अनेकजण उच्च पदावर पोहोचलेले आहेत. मात्र एवढ्यावरच थांबून जमणार नाही, तर वंजारी समाजाला अजून प्रगतीचा खूप मोठा टप्पा गाठायचा आहे.. असे विचार केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.भागवत कराड यांनी व्यक्त करुन, माणूस कितीजरी मोठा झालातरी त्याने समाजाला न विसरण्याची भुमिका व्यक्त केली. गोपिनाथराव मुंढे साहेबांमुळे वंजारी समाजाला ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगून, त्यांच्यामुळे आपण घडलो असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भ वंजारी समाज परिषदेच्या वतीने आज मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी स्थानिक गर्दे सभागृहात वंजारी समाजाचा मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी येवल्याचे आमदार किशोर दराडे, तर प्रमुख अतिथी म्हणून आ.संजय गायकवाड, धुळ्याचे महापौर प्रदिप करपे, माजी आ.तोताराम कायंदे, अॅड.अविनाश अव्हाड, गोपिनाथराव वाघ, बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर यांच्यासह वंजारी समाजसेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ, मधुकर जायभाये, पंजाबराव इलग व प्रभाकरराव कापकर उपस्थित होते.
ना.भागवत कराड पुढे म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबात जन्मलो असलोतरी आज देशाचा अर्थमंत्री म्हणून अनेक देशात भारताचे प्रतिनिधीत्व करतो. २५ राज्यात आतापर्यंत फिरलो असलोतरी व ठिकठिकाणी लाखोंच्या सभेला संबोधित केले असलेतरी, आज अत्यानंद यासाठी होतोय की हा घरच्याच लोकांनी आयोजित केलेला सत्कार आहे. समाजाने पाठीवर दिलेली थाप ही मोलाची असते. समाज आहे म्हणून मी आहे, ही जाण प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे काळाची गरज असल्याचेही प्रतिपादन ना.कराड यांनी केले. यावेळी अध्यक्षीय मनोगतात आ.किशोर दराडे यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतांन आपण अनेक प्रश्न समाजाचे सोडवू शकलो, याबद्दल आनंद व्यक्त करुन वंजारी समाजाचा मुलगा जिथे जातो तिथे क्रांती घडवतो.. असे उद्गार त्यांनी काढले. वंजारी समाज हा क्रांती घडविणारा समाज असल्याने, समाजामुळेच माझ्यासह बंधुलाही आमदारकीचा मान मिळाला, असे त्यांनी सांगून नाशिक जिल्ह्यात समाज कमी असतांनाही अनेक राजकीय पदांवर तो विराजमान आहे पण बुलढाणा जिल्ह्यात ते प्रमाण कमी असल्याची खंतही आ. दराडे यांनी यावेळी व्यक्त केली.
महापौर प्रदिप करपे यांनी तुम्ही कितीही मोठे असलातरी आई-वडिल व समाजाला विसरु नका, आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.. असा सल्ला त्यांनी गुणवंतांना दिला. माजी आमदार तोताराम कायंदे यांनी संघटित समाजच प्रगती करत असतो, असे सांगून समाजाच्या कामात राजकारण होता कामा नये.. अशी अपेक्षा व्यक्त करतांना संघटनेसाठी नव्या पिढीने पुढे येण्याची गरज व्यक्त केली. डॉ.सुकेश झंवर यांनी माहूरच्या रेणूका देवीपासून वंजारी समाजाचा इतिहास सांगून हा समाज कष्टाळू व सेवाभावी असल्याचे सांगत अशा मेळाव्याच्या माध्यमातून समाज जागृती होऊन समाजामध्ये ऐक्य निर्माण होत असल्याचे सांगितले. अॅड.अविनाश आव्हाड यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना, तुम्ही जर गुणी असाल व तुमच्यात कष्ट करण्याची क्षमता असेलतर समाज तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यास केव्हाही तयार असतो.. असे सांगून त्यासाठी विद्याथ्र्यांनी आपली निपुणता दाखविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी मंचावर भाऊराव करपे, रेणूराव हेमके, प्रा.अशोक डोईफोडे, योगेश कापकर, दिगांबरराव हुसे, चंद्रशेखर भडांगे, पंजाबराव क्षिरसाट, योगेश कापकर, जगन्नाथ बडे, डॉ.रमाकांत घुगे, वासुदेवराव घुगे, संतोषराव लहामगे यांचेसह fिfवदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.. संचलन पत्रकार राजेंद्र काळे तर आभार प्रदर्शन विजय जायभाये यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील समाजबांधवांनी योगदान दिले, अनेक समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
▪ भगवानबाबांचे स्मारक उभारणार-आ.गायकवाड
बुलढाणा जिल्ह्यात वंजारी समाजाचे संघटन मजबूत असून डॉ.राजेंद्र वाघ, मधुकरराव जायभाये व पंजाबराव इलग यांच्या नेतृत्वात ते सशक्त झाल्याचे आ.संजय गायकवाड यांनी सांगून, बुलढाणा शहरात २२ महापुरुषांची स्मारके होत आहेत. आता भगवान बाबांच्या स्मारकांसाठी सुध्दा ५० लाख रुपयांचा निधी देऊन ते उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प्रत्येक समाजाप्रमाणे वंजारी समाजालाही न्याय देण्याचा प्रयत्न आपण केल्याचे सांगून, सौ. कमलाताई जालिंधर बुधवत यांना आपल्याच प्रयत्नाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भेटले होते.. असे त्यांनी सांगून त्याचा किस्साही सांगितला. या मतदार संघात चालू असलेल्या विकासकामांची माहितीही आ.गायकवाड यांनी यावेळी दिली.
▪ एकच राज्यव्यापी समाज संघटन असावे-डॉ.वाघ
विदर्भ वंजारी समाज सेवा परिषद ५० वर्षापासून कार्यरत असलीतरी, आम्ही मराठवाडा व अन्य भागात हस्तक्षेप करत नाही. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी वंजारी समाजाची एकच संघटना असावी व त्यात ना.भागवतराव कराड यांनी पंकजाताई व धनंजय मुंढे यांना सोबत घेऊन त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ.राजेंद्र वाघ यांनी करुन या मेळाव्यात तीन ठराव मांडले. भारतात सर्व ओबीसींची जातनिहाय गणना व्हावी, ओबीसी व व्हीजेएनटी.साठी नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी व व्हीजेएनटी.मध्ये दोन टक्के नव्हेतर सरसकट आरक्षण वंजारी समाजाला देण्यात यावे.. हे तिन्ही ठराव टाळ्यांच्या गजरात समाजबांधवांनी पारित केले.
▪ ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार..
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.भागवतराव कराड यांच्या हस्ते वंजारी समाजातील ५० गुणवंत विद्याथ्र्यांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दहाव्या वर्गापासून तर स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्याथ्र्यांनी यश संपादन केले आहे. त्या सर्वांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्याथ्र्यांना उद्देशूनही अनेक नेत्यांनी संबोधित करतांना त्यांना समाजिक जबाबदारीची जाणिव करुन दिली. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेतर, समाज तुमच्या पाठिशी राहिल.. अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. आ.दराडे यांनी त्यांच्या संस्थेत समाजाच्या अनेक विद्याथ्र्यांना मोफत शिक्षण देत असल्याचे सांगितले. याचे सुत्रसंचलन प्रा.वाघ यांनी केले.