अहेरी (सेवा पवार) – अहेरी तालुक्यातील सर्वच रस्ते दुरुस्त करण्याची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेटलतीफपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात जुने रस्ते दुरुस्तीसह नवीन मंजूर रस्त्याच्या कामांना तात्काळ सुरुवात करण्याचे सक्तीचे निर्देश अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून, अहेरी उपविभागातील रस्त्यांचीही मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते दुरुस्तीचे कामे होऊ शकले नाही. त्यामुळे नागरिकांना विविध रस्त्यावरून ये-जा करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता पावसाने विश्रांती घेतली असून, तात्काळ विविध रस्ते दुरुस्ती तसेच नवीन मंजूर रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश ४ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या बैठकीत आमदार आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम, उप अभियंता पारेल्लीवार उपस्थित होते.
उद्यापासून ‘या’ रस्त्याच्या कामांना होणार सुरुवात
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सक्तीचे निर्देश देताच अहेरी ते आलापल्ली आणि अहेरी मुख्यचौक ते वट्रा व अहेरी मुख्य चौक ते सुभाषनगर पर्यंत ह्या तीन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम उद्यापासून सुरू करणार असल्याची हमी कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांनी दिली आहे.
——————–