Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

रविकांत तुपकरांनी राजू शेट्टींना पुण्यातून ललकारले; अंगावर याल तर शिंगावर घेऊ!

– लवकरच नवी शेतकरी संघटना; प्रस्थापितांच्या दावणीला गेलेल्या नेत्यांची राज्यातील पोकळी भरून काढणार!

पुणे (महेंद्र हिवाळे) – शेतकरी संघटनेच्या नावावर मोठे झालेले नेते सद्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दावणीला गेल्याने शेतकर्‍यांत निर्माण झालेल्या असंतोषाची धग आणखी चेतवत, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुण्यातील आपल्या बहुचर्चित बैठकीतून राजकीय परिपक्वतेचे निर्णय जाहीर केले. शेतकरी संघटनेतील अनेक नेते सद्या ‘खुडूक कोंबडी’ झाले असून, त्यांची जागा नवीन शेतकरी तरूण घेतील, यादृष्टीने तुपकरांनी आपले राज्यव्यापी नेतृत्वाच्या दिशेने पहिले पाऊल आज टाकले. त्यादृष्टीने त्यांनी आज (दि.२४) पुण्यात घेतलेली राज्यस्तरीय कार्यकर्ते व नेत्यांची बैठक चांगलीच गाजली. राज्यातील २७ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी हजर होते. बैठकीच्याआधी तुपकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. काहींनी नवीन पक्ष, नवीन आघाडी, नवी संघटना काढावी, अशा सूचना केल्या. अखेर सर्वांची मते विचारात घेऊन शेवटी भाषणात तुपकर यांनी मोठी घोषणा केली. चळवळीत काम करणार्‍या छोट्या मोठ्या संघटनांना सोबत घेवून ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’ची घोषणा त्यांनी करत, या आघाडीच्या माध्यमातून राज्यात आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे तुपकरांनी जाहीर केले. यावेळी सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या आघाडीच्या माध्यमातून राज्यात २५ जागांवर विधानसभा निवडणूक लढण्याचेदेखील त्यांनी घोषित केले. त्याचबरोबर शेतकर्‍यांसाठी लवकरच नवीन शेतकरी संघटना काढणार असल्याचेदेखील त्यांनी जाहीर केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आज भाषणातून राजू शेट्टी यांच्यावरदेखील जोरदार हल्ला चढविला. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, शेतकर्‍यांनी तुमचीच हकालपट्टी केली आहे, असा टोला तुपकर यांनी शेट्टींना लगावला. आयुष्याची २२ वर्षे शेतकर्‍यांसाठी लढलो, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, त्यामुळे लोकांनी भरभरून प्रेम दिलं. मात्र लोकांचे आपल्याला मिळत असलेले प्रेम शेट्टींच्या डोळ्यात खुपले, आपल्यापेक्षा मोठा माणूस झालेला शेट्टींना चालत नाही, असेही तुपकर म्हणाले. ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’च्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरू व राज्यभरातील उमद्या तरुणांना, सामान्य घरातून आलेल्या तरुणांची मोठी फळी उभी करू, असे सांगून तुपकरांनी पुन्हा एकदा शेतकरी चळवळ मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. अनेकांनी आपल्याला व्हीलन करण्याचा प्रयत्न केला. हकालपट्टीची बातमी जेव्हा माझ्या कानावर आली, ती माझ्यासाठी शॉकिंग होती. माझ्या डोळ्यासमोर २२ वर्षे चळवळीचा संघर्ष येऊन गेला. चळवळीसाठी आम्ही घरादाराची पर्वा केली नाही, घरादारावर तुळशीपत्र ठेवून, संसाराची राखरांगोळी करून आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ही संघटना वाढवली, असे तुपकर म्हणाले. महाराष्ट्राचा कानाकोपरा आपण चळवळीसाठी पिंजून काढला, गरम रक्ताचा असल्याने २००७ ला राजू शेट्टी यांच्यासोबत आलो. मात्र असे असले तरी आमचे चळवळीचे गुरू स्व. शरद जोशीच आहेत, असे सांगत तुपकर यांनी आपल्या भाषणातून चळवळीच्या संघर्षाची कहाणी वाचली. राजू शेट्टींचा चेहरा आम्ही महाराष्ट्रात पोहोचवला. आता आम्ही तुम्हाला जड वाटायला लागलो. माझी संघटनेतून तुम्ही हकालपट्टी करू शकता, पण जनतेच्या मनातून रविकांत तुपकरांची हकालपट्टी करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांनीच राजू शेट्टींची हकालपट्टी केली, असे तुपकर यावेळी म्हणाले. जालिंधर पाटलांनी आमच्या हकालपट्टीची घोषणा केली, पण स्क्रिप्ट राजू शेट्टींनी लिहून दिली, त्यांनी आमच्यावर चांगले तोंडसुख घेतले, आता तुम्ही अंगावर आले तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ, असे तुपकरांनी शेट्टी यांना ठणकावून सांगितले.ते म्हणतात रविकांत तुपकर यांना आम्ही मोठे केले. मग राजू शेट्टींना शरद जोशींनी मोठे केले, मात्र आमदारकीसाठी शरद जोशींना सोडले, मग सांगा कुणी कुणाशी गद्दारी केली, असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला. आता राजू शेट्टी आपल्याला ट्रोल करण्याच्या सूचना देतील, आता मीदेखील सांगतो ते अंगावर आले तर त्यांना शिंगावर घ्या, जशाच तसे उत्तर द्या, असे तुपकर कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. राजू शेट्टींनी अनेकांना बाजूला केले, ही काय हकालपट्टी संघटना आहे का? असा सवाल करीत रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला करण्यात आलेल्या व बाजूला झालेल्या नेत्यांची यादीच वाचून दाखवली. मी यांच्यातून गेलो नाही, यांनी मला बाजूला केले, आता मला माझी भूमिका मांडावी लागेल, असे तुपकर म्हणाले. माझ्यावर जर ते अजूनही आरोप करतील तर त्यांचं सगळच बाहेर काढील, असा इशाराही तुपकर यांनी यावेळी दिला. ज्यांनी मला काढण्याची घोषणा केली त्या जालिंधर पाटलांनीदेखील राजू शेट्टींच्या विरोधात विधानपरिषदेसाठी बंड केले होते, त्यांनी मीडियातून राजू शेट्टींवर आरोप केले, आता ते मला सांगतात की रविकांत तुपकर यांनी माrडियातून बोलू नये, हा विरोधाभास नाही का? असा सवालही तुपकरांनी केला.
तुम्ही राजकीय महत्वकांक्षा बाळगली तर चालते, आम्ही राजकीय महत्वकांक्षा बाळगली तर चूक? असा सवाल याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना उद्देशून केला. लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना पाठिंबा असल्याचे मीडियात सांगायचे आणि त्यांच्या लोकांना मात्र रविकांत तुपकर यांना पाडा, असे सांगायचे, हा दुटप्पीपणा नाही का? असा खडा सवाल करत, राजू शेट्टींनी मला व्हिलन केले, सदाभाऊंना व्हीलन केले. माझ्यामुळे ओळख मिळाली असे शेट्टी सांगतात. मग आमच्यामुळे तुम्हाला ओळख मिळाली असे म्हटले तर चुकले कुठे? तुम्हालाही आम्ही महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली, असे तुपकर यावेळी म्हणाले. आम्हाला शेट्टींनी फिटवायच काम केले, आता ते म्हणतील सायबांवर आरोप करता, मग तुम्ही परवा काशी केली ना..तुम्ही बोलले नसते तर मी बोललो नसतो, सुरूवात तुम्ही केली, असेही तुपकर म्हणाले. ते म्हणतात की रविकांत तुपकर यांनी मीडियातून राजू शेट्टींच्या आरोप केले. मग त्यांनीही मीडियातून पत्रकार परिषद घेऊन माझी हकालपट्टी केली, त्यांनी लेखीपत्र कुठे दिले? त्यामुळेच तर छातीवर बिल्ला कायम आहे, असे तुपकर छातीवरील बिल्ला दाखवत म्हणाले. याप्रसंगी तुपकर यांनी घणाघाती भाषणातून राजू शेट्टी यांच्या वागणुकीचे अक्षरशः वाभाडे काढले.


शेतकरी चळवळ पुढे नेणार!

आता आपल्याला चळवळ पुढे न्यायची आहे. राजकीय भूमिका वेगळी आणि चळवळ याची गफलत होता कामा नये, अशा सूचनाही रविकांत तुपकर यांनी यावेळी केल्या. राजू शेट्टींनी माझी हकालपट्टी केली, त्यादिवशी त्यांना चांगली झोप लागली असेल. वेळोवेळी भूमिका बदलणार्‍या शेट्टींवर कोणती समिती नेमायची? आमच्यावर लाठीचार्ज झाला तेव्हा शेट्टी ५० किलोमीटर अंतरावर होते, ते भेटायला आले नाही. आता मला सांगा चूक कोणाची? असा सवाल त्यांनी केला. भविष्यात आपल्याला मोठ काम उभ करायचं आहे. चळवळ आणि राजकीय भूमिका या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभेला २५ ठिकाणी निवडणूक लढवायची आपली तयारी आहे, त्यासाठी शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या वेगवेगळ्या संघटना, चळवळींना सोबत घेऊन ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’ची स्थापना करत असल्याची घोषणा याप्रसंगी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली.
——-

रविकांत तुपकर यांचे पुण्यातील ‘अन-कट’ भाषण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!