Head linesPolitical NewsPoliticsVidharbha

२० नोव्हेंबरला बुलढाण्यात दुमदुमणार अभूतपूर्व एल्गार!

– तुपकरांच्या एल्गार रथयात्रेने भरथंडीत बुलढाण्याचे वातावरण तापले, विराट महामोर्चाने सरकारला बसणार हादरे!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीन, कापसाला भाव, शेतीपिकांची नुकसान भरपाई आणि पीकविम्याची रक्कम मिळावी यासह इतर शेतकरीहितांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाभरात एल्गार रथयात्रा काढत जिल्हा पिंजून काढला होता. या रथयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे येत्या २० नोव्हेंबरला बुलढाणा येथे आयोजित एल्गार महामोर्चात सामील होण्यासाठी बळीराजांच्या फौजा शहरात धडकणार असून, या महामोर्चाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच हादरे बसणार आहे. आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांची फौज एकवटली आहे. शेतकर्‍यांचे हे वादळ , २० नोव्हेंबररोजी बुलढाण्यात धडकणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य ‘एल्गार महामोर्चा’ जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून जाणार आहे. या महामोर्चासाठी गावगाड्यातील शेतकर्‍यांसह शहरातील नागरिकदेखील एकवटले आहेत. त्यामुळे हा महामोर्चा लक्षवेधीच नव्हे तर सरकारला धडकी भरवणारा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीन कापूस – उत्पादक शेतकर्‍यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘एल्गार महामोर्चा’ आहे. या महामोर्चाची गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सरकारला शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सुबुद्धी दे अशी प्रार्थना करत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी रथयात्रेचा दणक्यात श्रीगणेशा केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यासह शेतकरी, शेतमजूर, तरुणांची मोठी फौज उभी करत रविकांत तुपकर यांनी गावखेडे पिंजून काढले आहेत. गावोगावी या रथयात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. स्वतःच्या खर्चाने आणि स्वयंस्फूर्तीने या महामोर्चात सहभागी होण्याचे वचन देत गावोगावी शेतकरी रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे हे प्रचंड मोठे वादळ उद्या (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे. बुलढाणा शहरातील जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथून दुपारी १२ वाजता या महामोर्चाची सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य मार्गाने फिरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल त्यानंतर तेथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन रविकांत तुपकरांची तोफ धडाडणार आहे.


अराजकीय आंदोलन जनआंदोलन होणार…

सोयाबीन – कापसाला दरवाढ मिळावी तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन – कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, पीकविमा व शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा महामोर्चा निघणार आहे. केवळ शेतकर्‍यांच्या हितासाठी हा लढा आहे. त्यामुळे कोणतेही पक्ष, संघटना व राजकारण बाजूला ठेवून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.


तुपकरांच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष?

या महामोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर पुढील राज्यव्यापी आंदोलनाची नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यापूर्वीची रविकांत तुपकरांची आंदोलने आक्रमक राहिली आहेत. दोन वर्षांपूर्वीचे अन्नत्याग आंदोलन राज्यभर चांगलेच पेटले होते तर गेल्या वर्षी थेट मुंबईतील अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनाने राज्यभरातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती, व सरकार हादरले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी चर्चेला बोलावून राज्य शासनाच्या आधारित असलेल्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या होत्या. तर आत्मदहन आंदोलनामुळे तुपकरांना व सहकार्‍यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. तुपकरांच्या आंदोलनांमुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात पीकविमा, नुकसानभरपाई, सततच्या पावसाची नुकसानभरपाई मिळाली, शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे यावर्षी रविकांत तुपकर नेमकी कोणत्या आक्रमक आंदोलनाची घोषणा करतात याकडे राज्यातील सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, रविकांत तुपकर काही तरी आक्रमक कृती करण्याची शक्यता पाहाता, पोलिस व गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरूवात केली असल्याची माहिती हाती आली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!