जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण?; राज ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न!
ठाणे (समिष्ठा चौहान) – मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळणार नाही, ही बाब मी मनोज जरांगे-पाटील यांना भेटल्यावरच सांगितली होती. जरांगे-पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का? हे येणार्या काळात कळेल, असे सूचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्याला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले. सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्हीही शोध घ्यावा, असे आव्हानच जरांगे-पाटलांनी राज ठाकरेंना दिले आहे. तसेच, राज ठाकरे यांनी भाजपचे कार्याध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्त्र डागले. ‘भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स हे नवीन खाते उघडले असावे’, अशी उपरोधिक टीका त्यांनी शाह यांच्यावर केली. अमित शाह यांनी भाजपची सत्ता आल्यास राम मंदिराचे दर्शन मोफत घडवू, असे आश्वासन निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. या विधानाचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. पदवीधर निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे हे ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून, सध्या त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. तर आज राज ठाकरे हे ठाणे दौर्यावर होते. दौर्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल महत्वपूर्ण विधान केले. अशाप्रकारे कोणतेही आरक्षण मिळणार नाही, असे काही घडणार नाही हे मी आधीच त्यांच्या समोर स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले. तसेच ‘यामागे जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागे कोण आहे? ज्यामधून जातीयवादातून महाराष्ट्र डिस्टर्ब करायचा प्रयत्न आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे घडत असून दिसतयं इतकं सरळ चित्र नाही यामागे कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल’ असेही राज ठाकरे म्हणाले.
सगळ्यांनी शोध घेतला तुम्हीही शोधा – जरांगे पाटलांचे राज ठाकरेंना आव्हान
यावर जरांगे-पाटील म्हणाले, ‘आमच्या पाठीमागे कोण आहे ते शोधून काढावं आणि सांगावं. सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्हीही शोध घ्यावा. यापाठीमागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. मराठा समाजातील मुलांचं कल्याण होत असल्यावर खोटे आरोप केले जातात. मराठा समाज कुणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवणार आहे.’
राज ठाकरे म्हणाले, की ‘या सगळ्यांमुळे मूळ मुद्दे भरकटवले जात आहेत. अन्यही महत्वाचे विषय आहेत. पण, वेगळ्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. ज्या गोष्टींमुळे जनता त्रस्त आहेत, ते विषय नागरिकांच्या डोक्यात येऊन नये म्हणून असा प्रयत्न केला जातोय. लोकांचे लक्ष विचलित केले जातंय,’ असेही राज ठाकरेंनी सांगितले. तसेच, १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हापासून जातीजातींमध्ये धोका निर्माण झाला. स्वतःच्या स्वार्थासाठी हे सर्व घडवले जाते असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेत सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही, वाजपेयींचा काळ वेगळा होता. तेव्हाची पद्धतही वेगळी होती, इडीच्या धाडी वगैरे फार काळ चालणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत त्यांनी भाजप नेतृत्वावरही टीकास्त्र डागले.