Breaking newsChikhaliHead linesVidharbha

चिखली तालुक्यातील राजकीय वातावरण तापले; ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

– तालुक्यातील ९ गावांच्या सरपंचपदासाठी राजकीय चुरस

चिखली (तालुका प्रतिनिधी) – नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणार्‍या तसेच २०२२ मध्ये प्रभागरचनेत झालेल्या गोंधळामुळे निवडणूक लांबलेल्या तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. एकूण ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीतून ८० सदस्यपदासांठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

चिखली तालुक्यातील नऊ गावांच्या सरपंचपदासाठी अंबाशी, करणखेड, मेरा खु., वरखेड, शेलगाव जहाँगीर या पाच गावांमध्ये सर्वसाधारण, असोला बु. अनु.जाती महिला, खंडाळा मकरध्वज सर्वसाधारण महिला, डोंगर शेवली नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि धानोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण आहे. प्रभाग रचनेतील गोंधळामुळे नायगाव बु., उदयनगर (उंद्री), किन्ही नाईक या तीन गावांमध्ये रिक्त सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १६ ते २० ऑक्टोबर ही अंतिम तारीख असून, दाखल उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबरला, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणार्‍या उमेदवारासाठी ५ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेचे काम तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. वैराळ, शिवशंकर चेके, एन. जे. उगले पाहत आहेत.


ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!