बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या महिन्यात जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले तर अनेक संसारदेखील उघड्यावर आले. हे संसार सावरण्यासाठी आता मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. राष्ट्रीय बँकांचे अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक नरेश हेड़ाऊ यांच्या पुढाकाराने संग्रामपूर तालुक्यातील शिवाजीनगर येथील ३५ कुटुंबांना १९ ऑगस्ट रोजी जीवनावश्यक वस्तू, भांड़ी व किराणा सामानाचे वाटप केले.
जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २१ व २२ जुलैरोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे अनेक नद्यांना महापूर येऊन हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. तर घराघरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. शासन नियमांच्या चौकटीला बांधील असल्याने मदतही नेमकीच असते. तर अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर, राजर्षी शाहू परिवाराचे संदीपदादा शेळके, तरूणाई फाऊंड़ेशनसह अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या. राष्ट्रीय बँकांचे अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक नरेश हेड़ाऊ यांच्या पुढाकाराने संग्रामपूर तालुक्यातील शिवाजीनगर येथील ३५ अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना काल, १९ ऑगस्टरोजी जीवनावश्यक भांड़ी व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नरेश हेड़ाऊ, स्टेट बँक ऑफ़ इंडियाचे रमेश करमकार, राजपूत, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अविनाश महाले, पवार, मेंड़के, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अमोल बाचे, बँक ऑफ इंडियाचे सिध्देश्वर पवार, बँक ऑफ़ महाराष्ट्रचे चेतन वानखेडे, इंडियन ओवरसीज बँकेचे आशीष कोठारी तसेच राजू पोपळघट, प्रभू अवचार, मंगेश पाटील यांच्यासह कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.