शरद पवारांचा लवकरच भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’?
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही; २०२४मध्ये राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार – शरद पवार
सोलापूर (खास प्रतिनिधी) – ‘तिकडे गेलेले (अजित पवार गट) काहीजण नाराज आहेत, त्यांना परत आणण्यासंदर्भात काही हितचिंतक चर्चा करत आहेत, तसेच तिकडूनही मध्यस्थांमार्फत निरोप येत आहेत’, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नवा राजकीय बॉम्ब फोडला. ‘सर्जिकल स्ट्राईक’ची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातून केली होती, अशी आठवण पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना करून दिली होती. त्यामुळे शरद पवार हे लवकरच भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सोलापूर व सांगोल्यात होते. यानिमित्त त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या राजकीय धोरणात भाजपसोबत युती शक्य करणे शक्य नाही. तसेच, काही हितचिंतक आमच्या तिकडे गेलेल्या (अजित पवार गट) सहकार्यांच्या भूमिकेत परिवर्तन करता येईल का, यासाठी प्रयत्न करत आहेत. काही लोक येतात. काही लोकं दुःखी आहे. त्यांना असे वाटते की, जे झाले ते चुकीचे झाले आहे. आमच्याकडून ते झाले नसते तर बरे झाले असते, असे काहींचे म्हणणे आहे. थेट येऊन बोलत नाहीत. पण कुणाच्या माध्यमातून सांगत असतात. सांगतात झाले गेले ते सांभाळून घ्या., असेही पवारांनी याप्रसंगी स्पष्ट केले. तसेच, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाकडे सूत्र असतील’, असेही पवारांनी नीक्षून सांगितले.
#WATCH | Solapur, Maharashtra: NCP chief Sharad Pawar says, "…In this regard, we are very clear that be it in power or in opposition…When we (both factions of NCP) were together or when we will be together, one thing is clear BJP's thinking & ideology do not fit in our… pic.twitter.com/nvwh6fuCD2
— ANI (@ANI) August 13, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीच भाजपसोबत जाणार नाही, असेही यावेळी पवारांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपसोबत जाणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. पुढील रणनीती ठरवण्यासाठी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबररोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आल्याचे सांगून, मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये १ सप्टेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, यात पुढील रणनीतीविषयी चर्चा होणार असल्याचे शरद पवार म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक होणार आहे. ३५ ते ४० नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार माझा पुतण्या; भेटला किंवा भेटीला बोलावले तर गैर काय?: शरद पवार
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या पुण्यातील भेटीबद्दल शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असे शरद पवार म्हणाले. अजित पवार हा माझा पुतण्या आहे, आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे, त्यामुळे मला कुणी भेटायला आले किंवा मी कुणाला भेटायला बोलावले, हा चर्चेचा विषय बनू शकत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
———-