मुख्यमंत्र्यांच्याहस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल – शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूर कडे प्रयाण. रात्री पंढरपूर येथे रात्री ११.३० वा. आगमन व शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती. रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थिती. पहाटे ५.३० वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन. पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती. सकाळी ११.४५ वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती. दु. १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती.
दुपारी ३ वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.
वाहनचालकांचा खोळंबा नको!
यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून संबंधितांना दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.