मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे दलित पँथरचे झुंजार सेनानी तथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख मनोजभाई संसारे यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.
मनोजभाई संसारे हे नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील सक्रीय नेते होते. त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून धारावीमधून निवडणूक लढविली होती. विशेष म्हणजे, त्यांचा वडाळा हा मतदारसंघ असताना त्यांनी धारावीतून निवडणूक लढवून वर्षा गायकवाड यांना जोरदार लढत दिली होती. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी त्यांनी लढा दिला होता. तसेच, आंबेडकरी समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती. मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज म्हणून ते परिचीत होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे कट्टर अनुयायी होते. अनेक सामाजिक व राजकीय आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांच्या अकाली निधनाने राज्यभर शोक व्यक्त केला जात आहे.