मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील रोहडा येथे जवळच असलेले तपोवन देवी संस्थान येथे विलास भीमराव इंगळे रा. तामसी, तालुका बाळापूर, जि.अकोला हे आपल्या पत्नी व सहावर्षीय मुलीसोबत लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. आज (दि.१२) लग्न सोहळा सुरू असताना त्यांची सहा वर्षीय मुलगी तपोवन देवी संस्थानच्या बाहेर काही स्टॉल लागले असता तिथे ती आली व तिथूनच बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही चिमुकली रस्ता चुकून कुठे गेली, की तिचे अपहरण झाले, या भीतीचे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती कळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी घटनास्थळी घाव घेत पोलिस फौजफाट्यासह परिसर पिंजून काढला, मात्र मुलीचा शोध लागण्यात अपयश आले होते.
साधारणपणे ११ ते १२ वाजेच्या सुमारास ही राधिका नावाची मुलगी गायब झालेली असून, सर्व पाहुणे मंडळींनी शोधाशोध घेतला असता कुठेही मिळून न आल्याने शेवटी त्यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार गणेश हिवरकर हे घटनास्थळी आले असता, त्यांनीसुद्धा कसून चौकशी केली व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या मुलीचा शोध घेतला. सर्व नातेवाईक व अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी तपोवन देवी संस्थांचा सर्व परिसर पिंजून काढला तरीसुद्धा सहा वर्षीय मुलगी सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत सापडली नव्हती. राधिका विलास इंगळे वय सहा वर्ष रा.तामसी ता.बाळापूर जि.अकोला ही मुलगी कुठेही आढळून आल्यास अंढेरा पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आव्हान ठाणेदार हिवरकर यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी ७७७४०५४१३३ हा आपला संपर्क क्रमांकदेखील दिला आहे. दिवसभर ही मुलगी न सापडल्याने ती कुठे असेल, तिचे काही बरेवाईट तर झाले नाही ना, की तिचे अपहरण झाले? या भीतीने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
————