आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री. ज्ञानेश्वर विद्यालयातील सन १९८८ – ८९ मधील दहावीच्या बॅचच्या वतीने लक्षवेधी अशा अविस्मरणीय सोहळ्याचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिक्षक गुरुजन कृतज्ञता सोहळा आणि माजी विद्यार्थी यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन उत्साहात केले. १९८८ – ८९ मध्ये आळंदीत दहावीत शिकलेले सुमारे शंभरवर माजी विद्यार्थी आणि २५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करीत उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना फेटे बांधत, औक्षण करून गुलाब पाकळ्यांचे माध्यमातून फुलांच्या पायघड्या करुन उत्साहात स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक प्रमोद मंजुळे होते.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील सेवा निवृत्त जेष्ठ शिक्षक गोविंद यादव, नानासाहेब साठे, हमीद शेख, छाया गायकवाड, दिपक मुंगसे, सरला जोशी, वृषाली पारख,जोत्स्ना मडके, लतिका आंद्रे, एल्. जी. घुंडरे, पंडित थोरात, प्रतिभा सोनवणे,सिद्धनाथ चव्हाण, वडगणे सर ,शशिकला बोरा, छाया गायकवाड शिक्षक गुरुजन उपस्थित होते. सर्व उपस्थित शिक्षकांचा शाल, नारळ, स्मृतिचिन्ह, पुस्तके, ज्ञानेश्वर माऊलींची मुर्ती व गुलाबपुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सन्मानाने शिक्षक अतिशय भारावून गेले होते.
सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी दहावी नंतर एकमेकांना तसेच शिक्षकांना तब्बल ३४ वर्षांनी भेटल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय व सध्या काय व्यवसाय करीत असल्याची माहिती देत संवाद साधला. अनेक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, पोलीस खात्यात, एअरफोर्समध्ये उच्च पदांवर कार्यरत, तसेच काही विविध खाजगी कंपन्यांमध्ये, शेती व विविध उद्योग व्यवसायात प्रगत झाल्याचे ओळख करून देताना एकमेकांना समजले. संवादात माहिती घेत ऐकून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रगती बद्दल कौतुकाची थाप दिली. जेष्ठ शिक्षिका वृषाली पारख,सरला जोशी, हमीद शेख, नानासाहेब साठे, डी. बी. मुंगसे, गोविंद यादव, छाया गायकवाड यांनी मनोगते व्यक्त करीत पुढील वाटचालीस मुलांना मार्गदर्शन केले.
शिक्षकांचे उपस्थितीत स्नेहमेळावा आणि शिक्षक कृतज्ञत्ता सोहळा दहावीच्या ८९ च्या बॅच मधील तिन्ही वर्गांनी प्रथमच एकत्रित केल्यामुळे असा सोहळा अविस्मरणीय व ‘न भुतो न भविष्यति’असा साजरा झाल्याच्या भावना आपल्या मनोगतातून अनेकांनी व्यक्त केल्या.
यावेळी सर्वांचा ग्रुप छायाचित्र घेत स्नेहभोजन,थंडगार आईस्किमचा आस्वाद घेण्यात आला. दरम्यान मनमुराद गप्पा टप्पा आणि उत्साहात फोटोसेशन झाले. यावेळी दुसऱ्या सत्रात माजी विद्यार्थ्यांच्या कविता सादरीकरण, गीत गायन झाले. यात याज्ञसेनी जोशी, मंदाकिनी केसरी, प्रा. शिल्पकला रंधवे, जनार्दन सोनावणे, डॅा. बाळासाहेब लबडे, मच्छिंद्र सुर्वे, सतिश शेलार, प्रविण थोरात, दत्तात्रय म्हस्के यांनी सादरीकरण करीत सोहळा रंगतदार केला.
सोहळ्याचे संयोजन प्रा. शिल्पकला रंधवे, जनार्दन सोनावणे,अर्जुन मेदनकर,राजेंद्र गिलबिले, संजय कडदेकर, जालिंदर गावडे, शिवाजी भोसले, जीजा शिंदे, कांचन गुंजाळ, मनिषा पिंपरकर, शिल्पा शहा, लीला थोरवे, सुधीर कुऱ्हाडे, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास थोरवे, अनिल मंजुळे,शंकर जाचक आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका यांना फेटा बांधून औक्षण करत शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्प गुच्छ देऊन उत्साहात सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी या शाळेतील दिवंगत शिक्षक, शिक्षिका आणि दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मूर्तीची पूजा, दिप प्रज्वलन झाले. या स्नेहमेळाव्यास विद्यालयाचे सेवा निवृत्त शिक्षक गोविंद यादव, नानासाहेब साठे, हमीद शेख, छाया गायकवाड, विद्यमान प्राचार्य दिपक मुंगसे, सरला जोशी, वृषाली पारख,जोत्स्ना मडके, लतिका आंद्रे, एल्. जी. घुंडरे, पंडित थोरात, प्रतिभा सोनवणे,सिद्धनाथ चव्हाण, वडगणे सर ,शशिकला बोरा, छाया गायकवाड शिक्षक गुरुजन उपस्थित होते. स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणीना उजाळा देत पुढील काळात सामाजिक कार्यातही सहभाग घेण्याचे ठरविण्यात आले. मुलीनी पुर्वीचे व सासरचे नाव सांगत आपली ओळख करून देत कुटुंबाची तसेच सद्या करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. यात शेती, सीए, पत्रकार, इंजिनियर, उद्योजक, शिक्षण, प्रशासन, उद्योग, सेवा, आदी क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगत बॅच सुसंस्कृत असल्याचे सागंत संवाद साधत बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद व्यक्त केला. उपस्थित शिक्षक, विद्यार्थीनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांचे मार्गदर्शन पुढील जीवन प्रवासास मार्गदर्शक असल्याचे यावेळी मुलांनी सांगितले. हमीद शेख, वृषाली पारख, प्रमोद मंजुळे, छाया गायकवाड, पंडित थोरात, गोविंद यादव आदींचे मनोगताने मुले भारावली. हृदयस्पर्शी मार्गदर्शन करीत अनेक उदाहरणे देत जीवनाचा सार शिक्षकांनी सांगितला.सोहळा अतिशय नीटनेटका, नियोजन पूर्वक शिस्तबध्द पध्दतीने पार पडला.
सूत्रसंचालन जनार्दन सोनावणे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शिल्पकला रंधवे यांनी केले. आभार शंकर जाचक यांनी मानले. सत्कार सोहळ्यानंतर सामूहिक पसायदान गायन झाले.