‘जल जीवन’मध्ये चुकीचे काम करणार्यावर कारवाई होणारच, निश्चिंत रहा!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जल जीवन मिशन योजनेमध्ये जे कोणी दोषी आढळेल, त्या दोषीवर कारवाईसाठी आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यामुळे दोषींची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. हे काम चांगल्या पद्धतीने व क्वालिटीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना कामाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गाव पातळीवरील जल जीवन मिशन योजनेचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती सर्वांना होणार आहे. विशेषतः ज्या १८९ टेंडर प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला होता त्याची तपासणी सुरू आहे. यातील काही जणांना कारणे दाखवून नोटीस देण्यात आले आहे. त्यामुळे या कारणे दाखवा नोटिसाचे उत्तर का येते ते पाहून पुढील कारवाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.
दरम्यान, सांगोल्याच्या ८ गावात झालेला घोटाळा प्रकरणी प्रशासनाने तयार केलेला अहवाल मी वाचला असल्याची माहिती शेकापचे बाबा कारंडे यांनी दिली. या प्रकरणात प्रमुख दोषी असलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना खुलासा देण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली असून, कोळी यांच्यासह उप अभियंता कमळे याच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. कमळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार आहे. ८ गावांमध्ये चुकीचे इस्टीमेट झाले असेल ते बदलावे आणि काही वस्त्या राहिल्या असतील तर त्या घेतल्या जाव्यात अशा सूचना करण्यात आल्या असल्याचे कारंडे यांनी सांगितले. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर आता त्याला उत्तर का येते त्यावरून पुढील कारवाईचे धोरण ठरणार आहे.