– मुक्कामी बसेस वार्यावर सोडल्यामुळे झाले होते निलंबन
सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – मुक्कामी बसेस वार्यावर सोडून नातेवाईकांकडे मुक्कामास गेलेल्या मेहकर आगाराच्या ११ वाहक व चालकांचे निलंबन अखेर एसटी महामंडळाने मागे घेतले आहे. सिंदखेडराजा आगारात हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता होती. तसेच, निलंबन मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाल्याने कारवाई मागे घेण्याची वेळ महामंडळावर आल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर असे, की १५ मार्च रोजी सिंदखेडराजा आगारामध्ये मेहकर येथील बसेस मुक्कामी होत्या. एसटी चालक व वाहक हे तपासणी पथकाला घटनास्थळी आढळून आले नव्हते. बसेस सोडून जाता येत नसल्यामुळे तपासणी पथकाने तसा अहवाल बुलढाणा येथे पाठवला होता. बुलढाणा वाहतूक निरीक्षक यांनी दिनांक २१ मार्च रोजी ११ वाहक व चालक यांना निलंबित करण्याचे आदेश काढले होते. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती.
त्यानंतर एसटी कष्टकरी संघानेदेखील आगार व्यवस्थापकाला निवेदन दिले होते व कारवाई मागे घेण्याची विनंती करत, मुक्कामाच्या ठिकाणी वाहक व चालक यांना सोयीसुविधा उपलब्ध नसतात. अनेक ठिकाणी पाण्याच्या सुविधा तसेच शौचालय उपलब्ध नसतात. तसेच विविध समस्यांबाबत अवगत केले होते. तसेच, या प्रकरणाला राजकीय वळणदेखील मिळण्याची शक्यता होती. शिवाय, महामंडळावर मोठा दबावही निर्माण झाला होता. ज्यांचे निलंबन झाले होते त्यामध्ये – आर . मुंढे , आर . भालेराव , अनंता मुंढे , डी. घुगे, व्ही . वाघमारे, सर्व चालक तर लता चौधरी ‘ एस. गिते . के . घुगे . रिता राठोड ‘ रमा चव्हाण वाहक यांचा समावेश होता. आता या सर्वांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनीसुद्धा उडी घेतली होती. त्यानंतर २४ मार्च रोजी वाहतूक निरीक्षक यांनी ११ वाहक व चालकाचे निलंबन मागे घेत असल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे वाहक व चालकाला दिलासा मिळाला आहे.