बुलढाणा ( प्रशांत खंडारे ) – स्वतःच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने शिबिरांचे आयोजन करून रक्तदान केले जायचे; पण राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी प्रत्येक वाढदिवस रक्तदानाने साजराच केला नव्हे तर, महिला- तरुणांमध्ये रक्तदानाचा ट्रेंड निर्माण केला आहे. संदीप दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पंधरवड्यात पहिल्यांदाच जिल्ह्यातील 75 ठिकाणी रक्तदान चळवळ उभी राहून तब्बल 3000 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. विशेष म्हणजे, या रक्तदात्यांना एक वर्षासाठी 1 लाख रुपयांचे अपघात विमा कवच संदीप दादांनी भेट म्हणून दिली आहे.
रक्ताचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व सर्वश्रुत आहे. कोरोना काळातील भीषण परिस्थितीमध्ये रक्ताच्या तुटवड्याची अनेकांना प्रखरतेने जाणीव झाली. अनेक वेळा उपचारासाठी रक्ताची गरज भासल्यास रक्त मिळत नाही. परंतु संदीप दादा शेळके यांचा वाढदिवस असला की ते अन्य सामाजिक उपक्रमांसह व्यापक स्वरूपात रक्तदान शिबीर आयोजित करतात. या रक्तदान शिबिरातून आतापर्यंत असंख्य युवकांनी रक्तदानाचा संकल्प घेतला. संकटकाली परिस्थितीत तरुणांच्या पुढाकारामुळे आणि रक्तपेढ्यांच्या पुढाकाराने बऱ्यापैकी रक्त संकलन होऊ लागले आहे. अनेक तरुण वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करत नियमित रक्तदानाचा संकल्प करत आहेत. रक्तदान करणे ही एक सामाजिक जवाबदारी आहे. ही संकल्पना तरुणांमध्ये रुजत असून, रक्तदानाचा ट्रेंड निर्माण होऊ लागला आहे.
उद्या 13 मार्च रोजीराजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप दादा शेळके यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात 23 फेब्रुवारीपासून पंधरवाडा आयोजित करण्यात आला होता. पंधरवड्यात जिल्ह्यातील 75 ठिकाणी राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू मल्टिस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संदीप दादांच्या मार्गदर्शनामुळे तरुणांमध्ये रक्तदानाचा संदेश अधोरेखित झाला असून, त्यांची रक्तदान करण्याची भीती दूर झाली आहे. पंधरवड्यात तब्बल 3000 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून 50 टक्के तरुणांनी रक्तदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान संदीप दादा शेळके यांनी सर्व रक्तदात्यांना एक वर्षासाठी 1 लाख रुपयांचे अपघात विम्याचे कवच मोफत दिले आहे.