BULDHANAMumbai

छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी ‘महावितरण’ला राष्ट्रीय पुरस्कार!

बुलढाणा/मुंबई (खास प्रतिनिधी) –  घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विजेता जाहीर केले असून नवी दिल्ली येथे आज (शुक्रवार २४ फेब्रुवारी) रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती अकोला जनसंपर्क अधिकारी यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ दिली.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या कोलकतास्थित संस्थेची स्थापना १९२५ साली उद्योगपती जी. डी. बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशातील अनेक प्रतिष्ठित व मोठे उद्योगसमूह चेंबरचे सदस्य आहेत. चेंबरने शुक्रवारी नवी दिल्ली येथे हरित ऊर्जेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित शिखर परिषदेत हरित ऊर्जा क्षेत्रातील देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वर्गवारीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. माजी केंद्रीय ऊर्जा सचिव श्री अनिल राजदान व ईआरइडाएचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री के. एस.पोपली यांच्याहस्ते महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री चंद्रमणी मिश्रा यांनी ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणतर्फ़े पुरस्कार स्विकारला. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची अशी ‘रूफटॉप सोलर’, योजना आहे. या योजनेला महावितरणच्या ग्राहकांची पसंती मिळाली आहे. राज्यात दि. २२ फेब्रुवारी रोजी रूफ टॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या ७९,५६४ झाली होती व त्यांच्याकडून १३८७ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली गेली होती. राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६ -१७ या आर्थिक वर्षात घरगुती रूफ टॉपचे केवळ १,०७४ ग्राहक होते व २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमता होती. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे व १,३८७ मेगावॅटची क्षमता गाठली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ नंतर आतापर्यंत ३५६ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची भर पडली आहे.

सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे वीजबिलात बचत होण्यासोबत पर्यावरण रक्षणाला मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!