मलकापूर (तालुका प्रतिनिधी) – जिल्ह्यातील रस्त्यावरून पायदळ चालत असताना,वाहने केव्हा जोरात जवळून जातात हे समजतही नाही. त्यामुळे नेहमीच जीव मुठीत घेऊन, मनात भीती बाळगूनच पायी चालावे लागते. दुचाकी, चार चाकी वाहनांच्या वेगाला ब्रेक कधी लागणार हे कळायला मार्ग नाही. मलकापूर येथे भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला.ही घटना १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चिखली रणथम जवळ घडली.
रस्ते अपघात दिवसागणिक वाढत आहेत.खामगाव येथील निलेश मोतीराम म्हात्रे (३२), अजय सोनवणे (३१) हे दोघे एम.एच २८, बी.एस.१२९० क्रमांकाच्या दुचाकीने मलकापूर येथून मुक्ताईनगर कडे जात होते. दरम्यान रस्त्यावरून चिखली रणथम यांची दुचाकी घसरली.या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच अजय सोनवणे (३१) याची प्राणज्योत मावळली. निलेश म्हात्रे याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, रस्ते अपघात रोखण्याचे आव्हान जिल्हा यंत्रणे पुढे आहे.