महाराष्ट्राला पुन्हा ‘सर्वोच्च’ जबाबदारी, न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राला पुन्हा एकदा सर्वोच्च जबाबदारी मिळाली आहे. मावळते सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्यानंतर आता न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असणार आहेत. १९७८ ते १९८५ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते, आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. धनंजय यशवंत चंद्रचूड असे त्यांचे पूर्ण नाव आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स आणि फॉरेन्सिक सायन्स मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. पुण्यातील कन्हेरसर हे चंद्रचूड यांचे मूळ गाव आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड १९७८ ते १९८५ या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड २९ मार्च ते ३१ ऑक्टोबर २०१३ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून करण्यात आली होती. २०१८ मध्ये धनंजय चंद्रचूड यांनी व्याभिचाराला गुन्हा मानणार्या कायद्याला रद्द केले होते. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला, त्यापैकी एक चंद्रचूड होते. दरम्यान, न्या. धनंजय चंद्रचूड यांना ही मोठी संधी मिळाली आहे. त्यांच्या आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार होत्या. वडील न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपद भूषवले. वडिलांचा वारसा चालवत न्या. धनंजय यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. महत्त्वाच्या व सार्वजनिक हिताच्या न्यायनिवाड्यांद्वारे न्यायदान करण्याबरोबरच कायद्याच्या विद्यार्थ्यांना अध्यापन, महाराष्ट्रातील न्यायाधीशांना प्रशिक्षण, विधी व न्यायाशी संबंधित लेखन आणि विद्यापीठांमध्ये व्याख्याने असे विविधांगी काम त्यांनी केले आहे.
—————–