– बाबू लॉज ते महाराणा प्रताप पुतळ्यापर्यंत वाहने व हातगाडीवाले यांना बसण्यासही प्रतिबंध
– हातगाडीवाले, भाजीविक्रेते यांना पारधी मठ येथे जागा उपलब्ध करून देण्याचे नगरपरिषदेला आदेश
– रस्त्याच्या मध्ये पार्किंग, भाजी, फळेविक्रेत्यांना मनाई
– बसस्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत अवैध प्रवासी वाहनांना प्रतिबंध
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली शहराची वाढलेली लोकसंख्या, वाहनांची होणारी गर्दी व वाहतूक कोंडी यामुळे किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात तर होतच होते. परंतु, सर्वसामान्य नागरिकांचेही अतोनात हाल होत होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते, तसेच रस्त्यावर वाहने पार्किंग गेली जात होती. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांना सविस्तर अहवाल सादर केला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी शहरातून अवजड वाहनांना सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत बंदी घातली असून, मुख्य रस्त्यावर हातगाड्या, वाहने लावण्यास प्रतिबंध जारी केले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (दि.२१) काढले असून, या आदेशाची शहरात पोलिसांनी अमलबजावणी सुरु केली आहे.
चिखली शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असून, रस्त्यांवरील अपघात व गर्दी रोखण्यासाठी मेहकर फाटा ते राऊतवाडी, शेलूद हायवे सुरु करण्यात आला आहे. तरीही मालवाहू व अवजड वाहतूक ही शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, बाबू लॉज चौक, डीपीरोड व शहरातून जात होती. त्यामुळे अपघात वाढून वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली होती. वाढती लोकसंख्या व वाहतुकीची समस्या पाहाता, जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यावर दाखल हरकतींची सुनावणी त्रीसदस्यीय समितीने घेतली होती. या त्रीसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशी जिल्हाधिकारी यांनी स्वीकारल्या असून, काल याबाबत आदेश पारित केला आहे.
त्यानुसार, चिखली शहरातून अवजड वाहतुकीस मनाई करण्यात आली असून, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहतुकीस शहरातून बंदी आहे. बाबू लॉज ते महाराणा प्रताप पुतळ्यापर्यंत सर्व वाहने, हातगाडी, रस्त्यात बसणारे व हातगाडी ठेवणारे यांना मधोमध विक्रीस मनाई घालण्यात आली आहे. या लोकांना तात्पुरत्या स्वरुपात पारधी मठ येथे जागा देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद व पोलिसांना दिलेले आहेत. मुख्य रस्ता सर्वसामान्य जनतेसाठी मोकळा ठेवण्यास सांगितले आहे. जयस्तंभ चौक ते बसवेश्वर चौक या दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी वाहने व हातगाडी पार्विंâगसाठी मनाई करण्यात आली आहे. बसस्टॅण्डपासून २०० मीटरपर्यंत अवैध प्रवासी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अॅटोस्टॉपसाठी बसस्टॅण्डशेजारी असलेली मोकळी जागा दिली आहे. यासह विविध सूचना आपल्या आदेशात जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आहेत.
- जिल्हाधिकारी यांचा सविस्तर आदेश वाचा – DOC-20220923-WA0219.