– मोदींसमोर उद्धव नखाएवढाही नाही, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना अरेतुरे!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – ‘उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावरचा नागोबा आहे. एक नंबरचा लबाड लांडगा, सगळं काही स्वर्थासाठी करतो. त्याचं शिवसेना पक्षवाढीसाठी योगदान काय? फक्त भाषणं करुन टोमणे मारायचे, एवढंच त्याचं काम. उद्धव ठाकरेंचं कुटुंब संपलंच आहे, त्यांना संपविण्याची कुणाला गरज नाही. संपलेल्यांना काय संपवणार…? प्रत्येक भाषणात मर्द शब्दाचा उल्लेख.. अरे किती वेळा मर्द आहे सांगतो, तुला तपासावं लागेल, आयुष्यात मर्दासारखं एक काम केलं नाही. सगळी कामं दुसर्यांकडून करून घेतली, अशा आक्षेपार्ह शब्दात अख्ख्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका केली. राणे यांच्या असल्या बोलण्याने शिवसैनिकांसह जनमाणसांत संतापाची भावना व्यक्त होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोरेगावच्या सभेची चिरफाड करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी आक्रमक अंदाजात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका केली. उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना त्यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याची धमकीही दिली. यावेळी ‘उद्धवजी ठाकरे’ म्हणत पत्रकाराने राणेंना प्रश्न विचारला. तर कोण उद्धवजी…? कोण उद्धव ठाकरे…? उद्धव… असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सन्मान देण्यास किंवा आदराने नाव घेण्यास विरोध दर्शवला. ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की मातृभूमीसाठी उद्धव ठाकरेनं काय केलं? उद्धव ठाकरे जगातला ढ माणूस आहे. ठाकरे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतो. १० आमदार निवडून आणण्याची त्याची ताकद नाही. पदासाठी, पैशांसाठी, हिंदुत्वाशी गद्दारी करणारा उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा आहे. अमित शाहांना आव्हान देण्याची औकात आहे का? उद्धव ठाकरेनं मुंबई बकाल केली, अशा शब्दांत राणे हे ठाकरेंबद्दल पातळी सोडून बोलले. भावना गवळींबद्दल बोलताना जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शिंदे-गट, भाजपच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.
मोदी – अमित शाह हे नेहमी महाराष्ट्राला मदत करतात. उद्धव ठाकरेनं आयुष्यात मर्दासारखं काम केलं नाही. मोदींचं नाव घेवू नका, तुम्हाला जड जाईल, ठाकरे मोदींच्या नखाएवढेही नाहीत. वाकड्या नजरेनं बघाल तर महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. ठाकरेंनी नैराश्यातून कालच्या मेळाव्यात भाषण केलं. उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे, अशा कठोर शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
“नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल
शिंदे गट आणि भाजपाकडे वाकड्या नजरेने बघू नका असे नारायण राणे म्हणाले आहेत. त्याला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी सुपारी घेतली आहे का ते सांगावे. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही एका गुंडाने सुपारी घेतल्याप्रमाणे बोलत आहात. प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुख आपल्या पक्षासमोर मांडणी करत असतो. त्यांना एवढी मिरची लागण्याची काय गरज? एक केंद्रीय मंत्री सुपारी घेतल्यासारखे बोलत असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.