– ग्रामपंचायतींच्या ६०८ जागांपैकी राष्ट्रवादीने १७३ तर भाजपने १६८ जागा जिंकल्या
– शिंदे गटाचा बार फुसकाच, मिळाल्या फक्त ४२ जागा
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा करणार्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आकडेवारीनिशी तोंडघशी पाडले आहे. या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला १७३ इतक्या सर्वाधिक तर भाजपला १६८ इतक्या जागा मिळाल्या आहेत, असे पवारांनी स्पष्ट केले. राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी लोकांना आवडली नाही, असेही पवार म्हणाले.
पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, की ग्रामपंचायतीच्या एकूण ६०८ जागा होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीने १७३, काँग्रेसने ८४, भाजपने १६८ आणि शिंदेगटाने ४२ जागा जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या याची आकडेवारी पवारांनी सांगितली नाही. ती आकडेवारी मला उपलब्ध झाली नाही, असे पवार म्हणाले. आम्हाला माहीत आहे आमच्या जागा किती आहेत. त्यामुळे आम्ही आकडेवारी सांगितली असे म्हणत, इतर पक्षांना जर वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर, त्यांनी त्या आनंदात राहावे, असा टोला पवारांनी भाजपचे नाव न घेता लगावला. पवारांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला २७७ जागांवर विजय मिळवला असून, शिंदे गट-भाजपला २१० जागा मिळाल्या असल्याचेही पवार म्हणाले.
मनसेकडून असा आरोप केला जातो की, शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहे. या राजकीय वक्तव्याकडे तुम्ही कसे पाहता?’ असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी मनसेच्या मर्मावर बोट ठेवले. ‘प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेसुद्धा ज्यांना विधीमंडळात (आमदार) निवडून आणता येत नाही. त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं,’ असे उत्तर शरद पवार यांनी दिले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सर्व प्रसारमाध्यमे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपच क्रमांक एकचा पक्ष आहे, असा घोषा लावत असताना, राज्यात फक्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेच या ग्रामपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी क्रमांक एक तर भाजप दुसर्या क्रमांकावर असल्याचे खरे आणि वास्तवदर्शी वृत्त दिले होते. राज्यभरातील आमचे नेटवर्क वापरून आम्ही वास्तव माहिती गोळा केली होती. त्यानुसार, महाविकास आघाडी, व अपक्ष मिळून ग्रामपंचायत निवडणुकांत ३८० पेक्षा जास्त जागा मिळाल्या असून, बंडखोर नेते शिंदे गटाला लोकांनी फारसे पसंत केले नाही. शिंदे गट व भाजप मिळून २१० जागा मिळालेल्या आहेत, हे आम्ही तेव्हाच स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीत महाविकास आघाडी बंडखोर, अपक्ष व इतर स्थानिक पातळीवरील आघाड्या यांनी मिळून १०८ जागा मिळवलेल्या आहेत, हे विशेष.
—————-