मोदींच्या कार्यक्रमांत अजितदादांचा अपमान!
पुणे/मुंबई (विशेष प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत राजशिष्टाचार पाळला गेला नसल्याचे दिसून आले असून, दादांचा अपमान झाल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. देहू येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले. पण अजित पवारांना बोलू दिले गेले नाही. याबाबत संताप व्यक्त होत असतानाच, आता मुंबईतील तिसर्या कार्यक्रमात अजितदादांना बसायला खुर्चीच दिली गेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अजितदादा दुसर्या रांगेतील खुर्चीत बसले.
राजभवनानंतर बीकेसीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मागील दुसर्या रांगेत बसवण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसह सर्वांंनीच या अपमानाबद्दल संताप व्यक्त केला. देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही, हा भाजपने महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवार यांना राज्यातील शेतकर्यांचे, कास्तकर्यांचे त्याचप्रमाणे वारकर्यांचेदेखील प्रश्न माहीत आहेत. पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी कार्यक्रम होत असताना महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हा अपमान जाणुनबुजून करण्यात आला का? हा महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रकार होता का? असे अनेक प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या अपमानाबद्दल संताप व्यक्त केला आहे.