– शेतकरी हवालदिल, शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील भरोसा येथील शेतकर्याच्या शेतातील शेडनेटचे चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, शेडनेटमधील हाताशी आलेल्या पिकांची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्ग करत आहे. भरोसा परिसरातील बहुतांश गावांतील शेतकर्यांचे शेडनेट काल व परवाच्या चक्रीवादळात तुटले असून, पिकेही हातची गेली आहेत. कृषी विभागाचे अधिकारी अद्यापही पंचनामे करण्यासाठी आलेले नव्हते.
भरोसा येथील शेतकरी भानुदास श्रीराम थुट्टे यांच्या शेतातील भरोसा भाग-२ गट नंबर ३५६, केशव श्रीराम थुट्टे गट नं ३८८, विष्णू श्रीराम थुट्टे गट नं ६, योगेश दगडू वाघमारे गट नं ५६१, दगडू सखाराम वाघमारे गट नं ५६२, आत्माराम नामदेव थुट्टे गट नं ५७३, सुनिता विठ्ठल शेटे गट नं ३३५, ज्ञानेश्वर उत्तम थुट्टे गट नं ३०, एकनाथ दगडू थुट्टे गट नं १६, ज्ञानेश्वर रमेश पुरी गट नं. १६९, ज्ञानेश्वर प्रकाश साबळे गट नं १३, शशिकला पांडुरंग देशमुख, विठ्ठल देविदास साबळे गट नं.१४, बबन गणपत भगत गट नं १०३, रंजना ज्ञानेश्वर थुट्टे गट नं ३६२, समाधान देविदास थुट्टे अशा या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रत्येकी २०८० चौरस मीटर आकाराचे शेडनेट गृह उभारण्यात आले होते. त्याला शासनाकडून अनुदानही मिळाले होते. भरोसा येथे कृषी विभागाअंतर्गत पोखरा ही योजना राबवण्यात आली होती. त्या अंतर्गत भरोसा येथे अंदाजे ४५ शेडनेट उभारण्यात आले आहे.
शेडनेटमध्ये विविध भाजीपाला, टोमॅटो तसेच काही कंपन्यांचे बीजोत्पादन कार्यक्रम घेत असतात. मात्र यावर्षी पाऊस कमी झालेला असताना दिवाळीनंतर वारंवार वादळी वारा पावसाच्या घटना घडत राहिल्या. त्यामध्ये अनेक शेतकर्यांचे शेडनेट उडून गेले. काहींनी शेडनेट दुरुस्त करून घेतले तर काहींचे लोखंडी पाइप वाकून पडले. कृषी विभागाकडून दुरुस्ती तर नाही तर उलट नोटिसा देऊन शेतकर्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. लाखो रुपये किमतीचे शेडनेटला शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी चिखली तालुका कृषी अधिकारी सवडतकर यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांच्यासह पत्रकार उध्दव पाटील, अंकुश पाटील, विष्णू थुट्टे, राजू शेटे, समाधान थुट्टे, भागवत वाघमारे, कैलास भगत, तानाजी चिकणे आदींसह शेतकर्यांनी केलेली आहे.