पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – मी खासदार नव्हतो परंतु सतत जनतेत राहिलो. मात्र या उलट जे विद्यमान खासदार होते ते मात्र सतत शूटिंगमध्येच व्यस्त राहिले. कधीही मतदारसंघातील गावांना भेट दिली नाही, कुठे फिरकले नाही. तेच पुन्हा मतदारसंघात मते मागायला येतात. लोकं एवढीही वेडी नाही, अशा शब्दांत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. शिरूर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथे गावभेट दौऱ्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
आढळराव पाटील म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मी सतत कार्यरत होतो. देशात नरेंद्र मोदींची सत्ता असताना अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आली.खासदार डॉ.अमोल कोल्हे हे हिशोब करत मोदींवर टीका करतात मात्र त्यांनी केंद्राने राबविलेल्या जलजीवन मिशन,स्वच्छ भारत मिशन,महिलांसाठी राबविलेल्या योजना,प्रधानमंत्री आवास योजना,पंतप्रधान ग्राम सडक योजना व यातून शिरूर लोकसभा मतदार संघात झालेली कामे याचाही अभ्यास करावा.पाच वर्षांत विकासाच्या बाबतीत मतदारसंघ खूप मागे गेला आहे.मी खासदार नसताना अनेक नागरिक मोठ्याप्रमाणात कामे घेऊन येत होती या उलट ते खासदार केवळ अन केवळ शूटिंग मध्येच व्यस्त होते.ते कधीच कोणाच्या सुख दुःखात सामील झाले नाही.त्यांना मतदारसंघातील लोकांचे प्रश्न तरी माहिती आहेत का अशी टीका आढळराव यांनी डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर केली.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की, स्व.माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर राहुल यांच्यावर जरी जबाबदारी असली तरी संपूर्ण तालुका आज राहुल यांच्यासोबत आहे.आपुलकी,प्रेम आपलेपणा जपणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील असून पराभव होऊन ही एकही रविवार त्यांचा जनता दरबार झाला नाही असे कधीच झाले नाही ते सतत जनतेचे प्रश्न सोडवत राहिले. आज मतदारसंघातील जनतेला काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असून पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच लोकांची पसंती असेल असे प्रदीप कंद म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे,ज्येष्ठ नेत्या जयश्री पलांडे,जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे,बापूसाहेब शिंदे,रवींद्र करंजखीले,रासपचे शिवाजी कुऱ्हाडे,भाजप तालुकाध्यक्ष आबासो सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रविबापु काळे, एकनाथ शेलार,शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, अमोल वर्पे,राजेंद्र कोरेकर, तज्ञिका कर्डिले, श्रुतिका झांबरे, सरपंच जगदीश पाचर्णे,नितीन पाचर्णे,मयूर थोरात आदी यावेळी उपस्थित होते.