रायपूर परिसरातून दारूबंदी केल्यानंतर अवैध दारूविक्रेते चिखली पोलिस ठाणेहद्दीत!
– अवैध दारूविक्रेत्यांना पोलिसांचे अभय का? पोलिस अधीक्षकांनी तातडीने लक्ष देण्याची गरज!
चिखली (महेंद्र हिवाळे) – रायपूर पोलिस ठाण्याच्या खमक्या ठाणेदारांनी त्यांच्या पोलिस ठाणेहद्दीतून अवैध दारूविक्री बंद केल्यानंतर हे अवैध दारूविक्रेते चिखली पोलिस ठाणेहद्दीत आपली विषारी दारू विकत आहेत. अनुराधा कॉलेज परिसरासह परिसरातील गावांत खुलेआम अवैध दारूविक्री सुरू असून, चिखली पोलिस या दारूविक्रेत्यांवर कारवाई करून ही दारू बंद का करत नाही, हा प्रश्न तालुकावासीयांना पडला आहे. चिखली पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील अवैध दारूविक्री तातडीने बंद न केल्यास परिसरातील गावांतील महिला व सामाजिक कार्यकर्ते हे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे.
अनुराधा कॉलेज परिसरात हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा परिसर आहे. त्यांच्या परिसर क्षेत्रात खुलेआम दारूविक्री होत असताना त्यांनी पोलिसांना जाब विचारणे व ही अवैध दारूविक्री बंद करणे अपेक्षित आहे. परंतु, तेदेखील या प्रकाराकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. कॉलेज परिसरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम दारू विकल्या जाते, आणि मैफिलसुद्धा सजवली जाते. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थी, विद्यार्थिनीवर पडत असल्याचे दिसून येत आहे. साकेगाव रोडवर हे महाविद्यालय चिखलीपासून हाकेच्या अंतरावर आहे. परंतु काही दिवसापासून या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राजेरोस अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे, आणि थेट मुलींच्या वस्तीगृहाच्या आसपास अवैध दारू विकली जाते, याकडे महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नसणे ही एक गंभीर बाब आहे. पोलिस प्रशासन व अवैध धंद्यावाल्यांची दोस्ती केव्हा तुटणार? असे प्रश्न येथील विद्यार्थिनी आता विचारू लागल्या आहेत. महाविद्यालयाचा आसपास अनुचित प्रकार घडू नये, अशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घर करत आहे. तर ज्या ठिकाणी ह्या विद्यार्थिनी राहतात, जेथून त्या नेहमी येणे जाणे करतात त्या मार्गावर किंवा परिसरात दारुच्या आहारी गेलेल्या नराधमाने काही अनुचित प्रकार घडवला तर त्यास जबाबदार पोलीस प्रशासन, कॉलेज प्रशासन, शासन की स्वतः त्या पिडीतेला जबाबदार धरावे, असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. चिखली तालुक्यातील परंतु चिखली पोलिस ठाणेहद्दीतील अनेक गावांतदेखील खुलेआम दारूविक्री सुरू असून, अवैध दारूवाल्यांना पोलिसांनी अभय दिले आहे का, असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. चिखली पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील अवैध दारूविक्री व अवैध धंदे तातडीने बंद केले नाहीत तर संतप्त महिला व काही सामाजिक कार्यकर्ते हे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.