चिखली (कैलास आंधळे) – मेरा ते साखरखेर्डा मार्गाने जात असताना अचानक रोही समोर येऊन त्याने दिलेल्या धडकेने भरधाव दुचाकीचा भीषण अपघात होऊन या अपघातात रमेश विक्रम गवई (वय ५५) रा. शिंंदी यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ते भन्तेजी होते. मेरा बुद्रूक गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आज (दि.२१) सकाळी ११ वाजता ही दुर्देवी घटना घडली.
सविस्तर असे, की रमेश गवई हे मेरा बुद्रूक – साखरखेर्डा रोडने जात असताना अचानक आलेल्या रोहीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. या धडकेने ते रस्त्यावर कोसळले. गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर ही दुर्देवी घटना घडली. ग्रामस्थांनी धाव घेऊन अंढेरा पोलिसांनी माहिती दिली. त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. गावातील काहींनी त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नातेवाईक व कुटुंबीय घटनास्थळी आले असता त्यांना रमेश विक्रम गवई (वय ५५) रा. शिंदी हे जागीच मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले. अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार हरिहर गोरे, मेरा बुद्रूकचे बीट अंमलदार देढे, पोलीस हेडकॉन्स्टेबल टेकाळे, वाहन चालक खार्डे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचासमक्ष पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आला. पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार हरिहर गोरे, मेरा बीटचे श्री देढे हे करीत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
—————-